
बारामती दि. २६ : ‘हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी ‘ या भावनेसह, टाळ-मृदंगाच्या गजरात, ‘ज्ञानोबा- माऊली तुकाराम’….रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी… अशा जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामती तालुक्यात आगमन होणार आहे. काल
मौजे खराडेवाडी येथे प्रशासनाच्यावतीने उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी पालखी रथ आणि दिंड्यांचे दर्शन घेऊन स्वागत केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खाजगी सचिव सचिन यादव, दौंडचे तहसीलदार अरुण शेलार, बारामतीचे गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सुपा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रशासनातर्फे वारकऱ्यांसाठी सुविधा
बारामती तालुक्यात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम उंडवडी गवळ्याची व बारामती शहरात शारदा प्रांगण या ठिकाणी आहे. आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तालुका प्रशासन, बारामती नगरपरिषद, पंचायत समिती, पोलीस विभाग, आरोग्य विभागाच्यावतीने तयारी केली आहे.
जर्मन हँगर पद्धतीचे मंडप, शुद्ध पिण्याचे पाणी, वीज, फिरते वैद्यकीय पथके, मोफत औषधोपचार, चरणसेवा, हिरकणी कक्ष, निवारा केंद्र, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, फिरते सुलभ शौचालय, कचरा वाहतूक घंटागाडी, कचरा कुंडी, पोलीस मदत केंद्र, अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका, सूचना फलक आदी व्यवस्था करण्यात आली असून ध्वनीक्षेपकाद्वारे सूचनाही देण्यात येत आहेत. आज बारामती येथे शारदा प्रांगणात तुकाराम महाराज यांच्या पालखी चा मुक्काम असणार आहे प्रशा वतीने विविध उपाय योजना तयारी केली आहे .


श्री संत तुकाराम महाराज व श्री संत सोपानकाका महाराज पालखी स्वागतासाठी बारामती सज्ज
पालखी सोहळा सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे-मुख्याधिकारी पंकज भुसे
बारामती, श्री संत तुकाराम महाराज पालखीचे आणि श्री संत सोपानकाका महाराज पालखीचे बारामती नगर परिषद हद्दीत आगमन होणार असून पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी नगर परिषद प्रशासन सज्ज झाले आहे, अशी माहिती मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी दिली आहे.

बारामती शहरात पालखीचा मुक्काम शारदा प्रांगण या ठिकाणी असून येणाऱ्या वारकऱ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याकरीता नगर परिषद युद्धपातळीवर काम करत आहे. संपूर्ण पालखी मार्गावरील रस्त्यांचे खड्डे भरणे, वारकरी पुतळा सुशोभिकरण करणे, रस्त्यांची स्वच्छता, धूर फवारणी, सार्वजनिक शौचालय दुरूस्ती व स्वच्छता आदी कामे करण्यात आली आहेत. शहरातील सर्व पथदिवे सुस्थितीत सुरु राहतील तसेच स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत दक्षता घेण्यात आली आहे. शहरातील हातपंप दुरूस्त करून विंधन विहिरींचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.

पालखी मुक्कामाचे ठिकाण असलेले शारदा प्रांगण येथे मंडप, स्टेज, विद्युत, शौचालय, स्नानगृह व निवारा आदी आवश्यक सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांसह ४५० अधिकारी व कर्मचारी असा संपूर्ण अधिकारी- कर्मचारी वर्ग वारकऱ्यांच्या व्यवस्थेसाठी काम करीत आहे. प्रत्येक कामासाठी स्वतंत्र समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. स्वच्छता व जनजागृतीविषयक कामासाठी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती आणि विद्या प्रतिष्ठानचे महाविद्यालय येथील एकूण १ हजार २०० स्वयंसेवक म्हणून काम करणार आहेत.
शहरात २६ ठिकाणी शौचालयाची सुविधा
बारामती नगर परिषद व बारामतीमधील ‘बारामती सजग नागरिक मंच’ यांनी संयुक्तपणे शौचालय व्यवस्थापनाचे नियोजन केले आहे. शहरात मार्केट यार्ड- इंदापूर रोड(२), मोतीबाग चौक, घोलप ऑटो, हॉटेल सुदित, देसाई इस्टेट, तुपे बंगला, कुलकर्णी बंगला, रेल्वे स्टेशन, पतंजली स्टोअर-भिगवण रोड, शिवकृपा सोसायटी, गोरे चाळ, श्रॉफ पेट्रोल पंप, नेवसे रोड, दाते गणेश मंदिर, सांस्कृतिक केंद्र, वणवे मळा, नाना नानी पार्क, पांढरीचा महादेव, कृषी उत्पन्न बाजार समिती (जळोची) अशा एकूण २६ विविध ठिकाणी शौचालय उभारण्यात येणार आहेत.
वारकऱ्यांकरिता ५ ठिकाणी टँकर भरण्याची सुविधा
सर्व दिंड्यांना टँकरने पाणी भरण्याकरीता जलशुद्धीकरण केंद्र(२), कॅनाल पुलावर पाटस रिंग रोड, अवचट इस्टेट, कचरा डेपो रस्ता, हॉटेल चैतन्य ५ ठिकाणी सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शारदा प्रांगण येथे वारकरी स्त्री पुरुष यांना वेगवेगळी स्नानगृहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.नगर परिषदेमार्फत शारदा प्रांगण येथे आपत्कालीन नियंत्रण कक्ष २४ X ७ कार्यरत ठेवण्यात आला आहे. हेल्पलाईन क्र.१८००२३३२३०२ कार्यान्वित आहे.
‘हरित वारी-सुरक्षित वारी’ उपक्रमाचे आयोजन
‘हरित वारी-सुरक्षित वारी’ उपक्रमा करिता नगर परिषद कार्यरत असून पालखी कालावधीत विविध ठिकाणी वारकऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच पालखी मार्गावर कचरा पडू नये यासाठी पेट्या ठेवण्यात येणार आहेत. तसेच कॅनालवर अग्नीशमन विभागामार्फत पहारा ठेवण्यात येणार असून कॅनाल मार्ग बंद करण्यात आलेले आहेत. प्लास्टिक मुक्त, तंबाखुमुक्त शहर ठेवण्यासाठी व पालखी सोहळा सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी श्री. भुसे यांनी केले आहे.
