
“माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत अजितदादांची अभूतपूर्व मुसंडी! ब गटातून ऐतिहासिक विजय, उरलेल्या जागांसाठी महारण रंगात – काही तासांत ठरणार वर्चस्वाची बाजी..!
माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक 2025-2030 साठी रणांगण गाजले असून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या ब गटाने निळकंठेश्वर पॅनलच्या माध्यमातून तब्बल १०१ पैकी ९१ मते पटकावत ऐतिहासिक विजय साकारला आहे. अजितदादांनी प्रचाराच्या सुरुवातीपासूनच प्रत्येक सभासदाच्या दारी जाऊन, प्रत्येक नाराजीचे निरसन करून प्रचाराची मोर्चेबांधणी केली होती. त्याचा परिणाम मतमोजणीच्या ट्रेंडमधून स्पष्ट दिसून आला आणि ‘ब’ गटातून निळकंठेश्वर पॅनलला मोठा विजय मिळाला.




यामुळे सत्ताधारी गटात जल्लोषाचे वातावरण पसरले असून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिनांक १३ जुलै रोजीच “माळेगाव साखर कारखान्याचा भावी चेअरमन मीच असणार!” अशी घोषणा करून विरोधकांच्या गोटात प्रचंड खळबळ उडवून दिली होती. अजितदादांनी प्रत्येक सभासदाच्या गळ्यातील माळेगावच्या गोड भविष्याची स्वप्ने साकार करण्याची ग्वाही दिली असून त्याचा हा विजय म्हणजे त्याच दृढ निश्चयाचा परिपाक ठरला.
दुसरीकडे, निवडणुकीत इतर गट – चंद्रराव तावरे, रंजनकुमार तावरे यांचे सहकार बचाव पॅनल, शरदराव पवार पुरस्कृत शेतकरी सहकारी पॅनल आणि कष्टकरी शेतकरी पॅनल – जोरदार चुरस देत आहेत. मात्र अजितदादांच्या विजयाची मोहोर उमटल्यामुळे निकाल लागण्यास वेळ लागत असला तरी गाव-गाड्यातील वातावरण अजून तापलेले आहे.
या चौरंगी लढतीत अजितदादांचे ‘निळकंठेश्वर पॅनल’ व गुरु-शिष्य असलेल्या तावरे यांचे ‘सहकार बचाव पॅनल’ यांच्यातील मुकाबला अटीतटीचा झाला आहे. शरदराव पवार समर्थित पॅनलला देखील काही मते खेचण्यात यश आले आहे. त्यामुळे ही निवडणूक किती रंगतदार व टक्करदायक ठरली हे प्रत्येकाच्या चर्चेचा विषय बनले आहे.
आता फक्त काही तासांचा अवधी शिल्लक! बारामती, माळेगाव आणि परिसरातील प्रत्येक सभासदाच्या ओठी एकच प्रश्न – “अखेर कोण मारणार बाजी? कोण होणार माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा अध्यक्ष ?”
निकाल लागण्याची उत्कंठा शिगेला पोहोचली असून यावर सर्वांचे डोळे लागलेले आहेत. अजितदादांनी ब गटातून जोरदार मुसंडी मारली आहे, आता उरलेल्या जागांवर कोण ताकद दाखवणार हे काही तासांच्या क्षणांतच स्पष्ट होईल