
“माळेगाव निवडणुकीत फक्त लढायचं नाही – सभासदांच्या प्रपंचाचा प्रश्न सोडवणारच!” – अजितदादांचा निर्धार
बारामती (21 मे) – “कारखान्याच्या सभासदांचा प्रपंच हा माझ्यासाठी केवळ प्रश्न नाही, ती माझी जबाबदारी आहे!” – असं ठणकावत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात पत्रकार परिषदेत स्पष्ट दिलखुलास भूमिका मांडली.
निवडणूक नुसती लढायची नाही, तर सभासदांच्या प्रत्येक अपेक्षेची पूर्तता करायची आहे. माळेगाव कारखान्याला राज्यातील ‘सर्वोत्तम कारखाना’ बनवायचा आहे – हेच आमचं उद्दिष्ट असल्याचं अजितदादांनी ठामपणे सांगितलं. “निवडणूक ही निमित्त आहे – मला जनतेच्या दरबारात जायचंय!” असं त्यांनी ठामपणे सांगत विरोधकांवरही तोफ डागली.

“प्रश्न प्रपंचाचा आहे – आणि तो मी सोडवणारच!”
माळेगावच्या २० हजार सभासदांचा यापूर्वी आवाज ऐकून घेत अजित पवारांनी सांगितलं की, सभासदांना दर व प्रपंचाचा हा प्रश्न माझ्या समोर मोठा आहे प्रामाणिक पारदर्शक व्यवहार, आणि कारखान्याच्या परिसरात विकासकामांत गती दिली जाईल.
निळकंठेश्वर पॅनलच्या माध्यमातून ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवली जाणार आहे, आणि मी स्वतः संचालक म्हणून राहिल्यास – तालुक्यापासून ते राज्यस्तरापर्यंत सर्व विषय सोडवायला मदत होईल, अशी खात्रीही अजितदादांनी दिली.

“पोटात दुखतेय का विरोधकांच्या?”
आपण अर्ज दाखल केल्यानंतर विरोधक गोंधळ घालत आहेत, अशा शब्दांत अजित पवारांनी टोला लगावत म्हटले – “माझा अर्ज हा माझा अधिकार आहे! तुमच्या पोटात दुखतेय का?”
विरोधक ‘पवार कुटुंबीय २६ टक्के उसाचे गाळप करत आहेत’ असे आरोप करत आहेत यावरही अजितदादांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं – “कोणीही ऊस घातलेला नाही, प्रत्येक युनिट स्वकर्तुत्वावर चालतं. निवडणूक माळेगावची आणि आरोप पवार कुटुंबीयांवर? हे योग्य नाही!”
“कर्जाचे आकडे, साखरेचा साठा – सगळं पारदर्शक!”
बाळासाहेब तावरे आणि केशवराव जगताप यांच्या कार्यकाळात कारखान्यावर २२९ कोटींचं कर्ज असतानाही, २७९ कोटींच्या साखरेचा साठा आहे – ही गोष्ट विरोधकांनी लक्षात घ्यावी, असा मुद्दाही त्यांनी ठामपणे मांडला.
सीएसआर फंडातून विकासकामे, कोणताही अतिरिक्त भार न टाकता परिसराचा कायापालट – हे अजित पवारांचं व्हिजन आहे, जे त्यांनी आज पत्रकारांसमोर मांडलं.
यावेळी अध्यक्ष केशवराव जगताप, मा. अध्यक्ष बाळासाहेब तावरे, तालुका अध्यक्ष राजवर्धन शिंदे, संभाजी होळकर, सचिन सातव, संदीप जगताप आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद पार पडली.

माळेगावच्या निवडणुकीला रंग चढत असताना, अजित पवारांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं – “आम्ही मतासाठी नाही, विकासासाठी मैदानात उतरलो आहोत. शब्द दिला आहे, तो पाळणारच!”
ह्या ठाम आणि सणसणीत भूमिकेमुळे माळेगावच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘अजितदादा झिंदाबाद’ चा नारा जोरात घुमणार काय याचे उत्तर येणाऱ्या आगामी काळात दिसून येईल