बारामती एमआयडीसीत पाणीटंचाईचे तीव्र संकट; नागरिकांना विकतचे पाणी घेण्याची वेळ…!
बारामती एमआयडीसी परिसरात गेल्या दीड महिन्यापासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. वाढते नागरीकरण, रहिवाशांची वाढती संख्या, शैक्षणिक संकुले तसेच औद्योगिक वसाहतीमुळे पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, त्यानुसार पाणीपुरवठ्याची व्यवस्था सक्षम न झाल्याने परिसरातील नागरिकांचे हाल होत आहेत.
भर उन्हाळ्यात उष्णतेचा कडाका वाढल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. अनेक भागांत नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना टँकरचे किंवा विकतचे पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे. पाण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागत असल्याने अनेक कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
विशेषतः सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना दोन महिन्यांच्या पाण्याच्या खर्चामुळे वर्षभराचे बजेट बिघडण्याची भीती निर्माण झाली आहे. “पाणी ही मूलभूत गरज असताना आम्हाला पैसे मोजून पाणी विकत घ्यावे लागत आहे. प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात,” अशी भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.
बारामती एमआयडीसी परिसरातील वाढती लोकसंख्या आणि औद्योगिक विस्तार लक्षात घेता प्रशासनाने दीर्घकालीन जलव्यवस्थापनाचा आराखडा तयार करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.



