बारामतीकरांच्या रोजच्या आठवणीतील अजितदादा…स्थानिक पत्रकारितेकडे त्यांचे लक्ष !

0
45

बारामतीचा विकास: दूरदृष्टी, पत्रकारिता आणि उपमुख्यमंत्री स्व . अजितदादांचे कर्तृत्व…!

संतोष शिंदे: संपादक भावनगरी बारामती
9822730108

एखाद्या गावाचे, तालुक्याचे किंवा जिल्ह्याचे भविष्य केवळ नशिबावर अवलंबून नसते; ते घडवण्यासाठी दूरदृष्टी असलेले नेतृत्व, त्याला साथ देणारी कार्यकर्त्यांची फळी, प्रशासनाची बांधिलकी आणि समाजाला दिशा देणारी पत्रकारिता आवश्यक असते. बारामतीने हे समीकरण यशस्वी करून दाखवले आहे.

पत्रकार हा समाजाचा आरसा असतो, पण तो केवळ घटनांचा वृत्तांत देणारा नसतो. तो समाजाला दिशा देणारा, विकासाच्या कल्पना लोकांपर्यंत पोहोचवणारा आणि जनतेच्या आशा-आकांक्षांना आवाज देणारा असतो. पत्रकारितेने जर विकासाचा ध्यास घेतला आणि त्याला दूरदृष्टीच्या नेतृत्वाची साथ मिळाली, तर एखाद्या गावाचा चेहरामोहरा बदलू शकतो. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे बारामती.

आज बारामतीची ओळख केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिलेली नाही. देशाच्या कानाकोपऱ्यात आणि जगाच्या अनेक भागांत बारामतीचे नाव आदराने घेतले जाते. या परिवर्तनामागे ज्यांनी आयुष्य झोकून दिले, त्यामध्ये ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब आणि उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचे योगदान अनन्यसाधारण आहे.

स्व .उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे केवळ राजकारणी नव्हते, तर विकासाला धर्म मानणारे कार्यकर्ते व राज्यकर्ते ते बनले होते. त्यांनी बारामतीच्या विकासाचा असा पाया रचला की आज अनेक राज्ये आणि प्रशासन यंत्रणा बारामतीच्या विकास मॉडेलचा अभ्यास करत आहेत. रस्ते, उद्योग, शिक्षण, पाणीपुरवठा, शेती, आरोग्य, रोजगार आणि आधुनिक नागरी सुविधा या सर्व क्षेत्रांत बारामतीने जी झेप घेतली, ती दादांच्या दूरदृष्टीचे फळ आहे.

मागील वर्षी मी, साप्ताहिक भावनगरीचा संपादक म्हणून, कोलकाता येथे गेलो होतो. तेथे रेल्वे स्थानकावरील एका अधिकाऱ्याशी संवाद साधताना मी माझे नाव आणि गाव सांगितले. “बारामती” हे नाव ऐकताच त्यांच्या चेहऱ्यावर आदरभाव उमटला. त्यांनी तात्काळ शरद पवार साहेब आणि स्व . अजितदादा पवार यांचा उल्लेख केला आणि म्हणाले, “तुमच्या महाराष्ट्राला आणि तुमच्या नेत्यांना आमचा सलाम. त्यांनी स्वतःचा गाव, शहर आणि जिल्हा घडवून संपूर्ण देशाला विकासाचा आदर्श दिला आहे.”

हे ऐकताना मला अभिमानाची जाणीव झाली. बारामतीची कीर्ती किती दूरवर पोहोचली आहे, याचा तो जिवंत अनुभव होता.

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी एकदा म्हटले होते, “देशात शंभर शहरे बारामतीसारखी झाली, तर भारत महासत्ता होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.” हे विधान बारामतीच्या यशाची साक्ष देणारे आहे.

आज जगाला बारामतीचा हेवा वाटतो. कारण इथे विकास हा घोषणांमध्ये नाही, तर प्रत्यक्ष कामांमध्ये दिसतो. हा प्रवास एका दिवसात झालेला नाही. यासाठी हजारो कार्यकर्त्यांनी घाम गाळला, पत्रकारांनी सकारात्मक विकासाची बाजू मांडली, अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केले आणि जनतेने नेतृत्वावर विश्वास ठेवला.

म्हणूनच बारामतीकरांनी स्व . अजितदादा पवार यांचे योगदान कधीही विसरता कामा नये. कारण त्यांनी केवळ रस्ते, इमारती किंवा प्रकल्प उभे केले नाहीत; त्यांनी बारामतीची एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी विकासाचा असा इतिहास घडवला, जो संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरला आहे.

आज बारामतीचे नाव देशाच्या विकास नकाशावर सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. ही केवळ एका शहराची कथा नाही, तर दूरदृष्टी, कष्ट, नेतृत्व आणि सामूहिक प्रयत्नांची यशोगाथा आहे. या यशोगाथेचे प्रमुख शिल्पकार म्हणून शरद पवार साहेब आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांचे नाव भविष्यातही आदराने घेतले जाईल, यात शंका नाही.

बारामती ही केवळ एक जागा नाही, तर ती विकासाचा विचार धारा आहे, प्रगतीचे स्वप्न आहे आणि ते स्वप्न सत्यात उतरविणाऱ्या नेतृत्वाचा जिवंत पुरावा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here