बारामती – केवळ शहर नव्हे, तर विकासाची जिवंत प्रतिमा!
भावनगरी…. संपादक संतोष शिंदे…९८२२७३०१०८
बारामतीचे रस्ते आता केवळ गाड्यांसाठी नसून, माणसाच्या शरीरसौष्ठवासाठी, आरोग्यासाठी व मानसिक ताजेपणासाठी खुलले आहेत. नव्याने तयार झालेल्या फुटपाथवर सकाळी-संध्याकाळी लहानांपासून थोरांपर्यंत चालणाऱ्यांची वर्दळ असते. कधी कोणाचे डंबेल्स, कधी पाठीसाठीचा व्यायाम करणारी मंडळी, तर कधी झुल्यावर झोका घेत आत्मा सुखावून घेणारे ज्येष्ठ नागरिक – हे सगळं दृश्य म्हणजे बारामतीतल्या प्रगतीचा, सुसंस्कृततेचा आणि आरोग्यजागरूकतेचा प्रत्यक्ष पुरावा!
संगीताच्या मधुर लहरींनी जागणारे उद्याने…
पुनावाला गार्डन, नक्षत्र गार्डन आणि इतरही अनेक ठिकाणी सकाळच्या कोवळ्या उन्हात किंवा संध्याकाळच्या थंडगार वाऱ्यात जेव्हा मधुर संगीताची लकेर हळूच कानावर येते, तेव्हा मन अगदी शांत, समाधानी होतं. आरोग्य सुधारतंच, पण मनही प्रसन्न होतं – हीच खरी अजितदादांची जादू!
हा विकास केवळ योजनांचा नव्हे, तर पालकत्वाचा आहे.
अजित पवार, सुनेत्रा पवार, शर्मिला पवार आणि त्यांच्या कुटुंबातील कार्यकर्ते हे केवळ नेते नाहीत – ते या शहराचे पालक आहेत. त्यांनी बारामतीला केवळ नकाशावरच मोठं केलं नाही, तर मनात स्थान दिलं. भौतिक विकासासोबतच सामाजिक समरसतेचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे.
रोज नवनव्या गरजा, पण अजूनही अपार संधी…
शहर वाढतंय – कॉलेज, हॉस्पिटल्स, उद्योगधंदे आणि लोकसंख्या यामुळे रहदारी आणि पायाभूत सुविधा यांच्यावर ताण येतो आहे. पण अजित पवार यांच्या दूरदृष्टीमुळे या सगळ्यावर उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, केवळ त्यांच्यावरच जबाबदारी सोपवून चालणार नाही. आपण सर्वांनीच पाण्याचे स्त्रोत, प्रदूषण नियंत्रण, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था या बाबतीत पुढाकार घेतला पाहिजे.
शहराचा खरा विकास – जनतेच्या सहभागातूनच!
नेते निधी आणतात, कामे मंजूर करतात, पण त्याची निगा राखणं हे आपलं काम आहे. बारामतीतील मंदिर, शाळा, नद्या, महाविद्यालये – सगळे परिसर आपलेच आहेत, त्यांना स्वच्छ ठेवणं, सजवणं ही आपल्या संस्कृतीची गरज आहे.
वाहनवाढ, इमारती, कचरा, वाढलेली महागाई – यावर उपाय हवा
सिटी बस, स्थानिक सेवा, मूलभूत सुविधा – हे सर्व सर्वसामान्यांना परवडावं, यासाठी धोरणात्मक बदलांची गरज आहे. त्या दृष्टीने विचार करूनच शहराचा सर्वांगीण विकास शक्य आहे.
अजितदादा – एक नेता नव्हे, एक आपुलकीचा चेहरा!
बारामतीमध्ये कोणताही नेता आला की, त्याला इथे घरच्यासारखं वाटतं – ही भावना अजित पवारांनी निर्माण केली आहे. त्यांच्या कार्याची आणि आदरणीय शरद पवार साहेबांच्या वारशाची उर्जा आज सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नांतूनही जाणवते. हीच वारसागत प्रेरणा बारामतीच्या अंगात भिनली आहे.
राजकारण नव्हे, विकासकारण!
बारामतीने महाराष्ट्राला एक संदेश दिला आहे – “राजकारण कमी, विकासकारण अधिक!” आज येथे येणाऱ्या पाहुण्याला देखील वाटतं – “आपणही आपलं गाव बारामतीसारखं घडवू!”
भावनगरीची बारामती – आपल्या माणसांची, आपल्या स्वप्नांची!
बारामतीचा झगमगता चेहरा, सुशोभीत रस्ते, नित्य बदलतं रूप आणि माणूस म्हणून जगवणारी व्यवस्था ही अजित पवार व त्यांच्या टीमच्या निष्ठेची, बारामतीकरांच्या साथ-संवेदनशीलतेची आणि आपुलकीच्या बंधनाची जिवंत साक्ष आहे……
