बारामती शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला – नागरिक त्रस्त
बारामती शहर आणि परिसरात भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्यांवर मुक्त संचार करणारे हे कुत्रे रहदारीस अडथळा ठरत असून, अपघातांमध्ये वाढ झाली आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांसमोर अचानक कुत्रे आडवे आल्याने अनेकदा अपघात होण्याच्या घटना घडतात.
लहान मुलांसाठी ही समस्या अधिक गंभीर ठरत आहे. अनेक वेळा भटके कुत्रे मुलांवर हल्ला करून त्यांना जखमी करतात. तसेच, रस्त्याच्या कडेला असलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांमधून हे कुत्रे अन्न पळवून नेतात, ज्यामुळे दुकानदार व ग्राहक दोघेही त्रस्त आहेत.
शहरातील मुख्य चौक, गजबजलेल्या रस्त्यांसह गल्ल्यांमध्येही हे कुत्रे मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. रात्रीच्या वेळी भुंकणे आणि झुंडीने फिरणे यामुळे नागरिकांना त्रास होत आहे.
नगरपालिका प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अनेक नागरिकांनी याबाबत तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप समाधानकारक उपाययोजना करण्यात आलेली नाही. कुत्र्यांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी आणि नागरिकांचे सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी बारामती नगरपालिका हद्दीतील नागरिकांची मागणी आहे.

