
बऱ्हाणपूरात ‘माऊली… माऊली’च्या गजरात नक्षत्र ग्रुपचा सेवायज्ञ; हजारो वारकऱ्यांना प्रेमाने चिवड्याचे वाटप
बारामती
संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामुळे बारामती तालुक्यातील बऱ्हाणपूर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. “माऊली… माऊली”, “विठ्ठल… विठ्ठल” आणि “जय जय राम कृष्ण हरी”च्या अखंड गजरात, हलक्या पावसाच्या सरींनी या सोहळ्याचे पावित्र्य अधिकच खुलवले. अशा मंगलमय वातावरणात नक्षत्र ग्रुप, बारामती यांच्या वतीने हजारो वारकरी भाविकांना प्रेमपूर्वक चिवड्याचे वाटप करून सेवाभावाचा आदर्श उपक्रम राबविण्यात आला.

बारामतीतील नक्षत्र गार्डन येथे दररोज सकाळी एकत्र येणाऱ्या नक्षत्र ग्रुपच्या सदस्यांनी आरोग्यासोबत समाजसेवेचाही वसा जपत पालखी सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेत विठ्ठलनामात तल्लीन झालेल्या सदस्यांनी वारकऱ्यांची मनापासून सेवा केली. या सेवाकार्याचे वारकऱ्यांनी भरभरून कौतुक करत ग्रुपवर शुभेच्छांचा वर्षाव केला.

सेवा उपक्रमानंतर सुधीर उमाप यांच्या माध्यमातून सुयश चांदगुडे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भक्तिरसाने ओतप्रोत भरलेला भजनाचा कार्यक्रम रंगला. तसेच दिंडीच्या प्रमुखांचा नक्षत्र ग्रुपच्या वतीने श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी पुढील प्रवासासाठी बारामतीच्या दिशेने मार्गस्थ झाली.
या सेवाकार्यात प्रदीप गिराम, पी. एस. कांबळे, शिवाजी गोसावी, संतोष शिंदे, पी. एन. कांबळे, सुनिल तावरे, सुनील मस्के, दिपक कदम, सर्जे सर, माने सर, घाडगे सर, राजेभाऊ साळुंके, सुधीर उमाप, रतिलाल चौधर, संजय पाटील, आर. के. गौंड आणि बी. जे. पांढरे यांनी सक्रिय सहभाग घेतला.

नक्षत्र गार्डनमधून रुजलेली मैत्री, सेवाभाव आणि विठ्ठलभक्ती यांचा सुंदर संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळाला. समाजसेवा आणि भक्तीची ही परंपरा भविष्यातही अशाच उत्साहाने सुरू राहील, असा विश्वास सदस्यांनी व्यक्त केला.
॥ जय हरी विठ्ठल… माऊली माऊली… ॥



