
सुरक्षित बारामतीसाठी बारामतीकरांचे एकत्रित आंदोलन: “अपघातमुक्त बारामती”ची जोरदार मागणी
बारामती | ३१ जुलै २०२५
खंडोबानगर येथील हृदयद्रावक अपघातानंतर संपूर्ण बारामतीकरांनी एकत्र येत आज प्रशासकीय भवनासमोर ठिय्या आंदोलन करत “सुरक्षित बारामती, अपघातमुक्त बारामती”ची जोरदार मागणी केली.
या भीषण अपघातात आचार्य कुटुंबातील वडील आणि दोन चिमुकल्या मुलींचा जागीच मृत्यू झाला होता. त्या धक्क्याने ओंकार आचार्य यांचे वडीलही काल निधन पावले. या दु:खद घटनेमुळे संपूर्ण शहर हळहळून निघाले असून, नागरिकांमध्ये संतापाची भावना पसरली आहे.
बारामती शहरामध्ये दिवसेंदिवस वाढणारे अपघात, विशेषतः अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या हायवा वाहनांमुळे निष्पाप नागरिकांचे बळी जात असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी ठोस उपाययोजनांची मागणी केली आहे.



नागरिकांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे:
अरुंद रस्त्यांचे रुंदीकरण
रस्त्यावरील अतिक्रमण हटवणे
पार्किंगसाठी स्वतंत्र जागा निश्चित करणे
रस्त्याच्या दुतर्फा स्ट्रीट लाईटची व्यवस्था
शाळा व कॉलेज सुटल्यानंतर वाहतूक कोंडीवर उपाय
अपूर्ण स्पीड ब्रेकरवर पांढऱ्या पट्ट्यांची रेखाटने
पेन्सिल चौकात सिग्नल यंत्रणा बसवणे
वर्दळीच्या भागात CCTV कॅमेरे बसवणे
मुलांच्या खेळण्यासाठी असलेल्या ठिकाणी सेफ्टी जाळी बसवणे
अंतर्गत व मुख्य रस्त्यांवर गतिरोधक बसवणे
चौकात ट्रॅफिक पोलीसांची नियुक्ती व प्रभावी वाहतूक नियंत्रण
सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत शहरातून अवजड वाहतूक बंद करणे
सातव चौक रेल्वे ब्रिजवर अवजड वाहतूक थांबवणे
तांदुळवाडी रोड व टेक्निकल शाळांच्या परिसरात वाहतूक नियोजन
कारभारी चौक सर्कलचे पुनर्रचना
तीन हत्ती चौकातील फसलेले नियोजन पूर्ववत करणे
अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई
अपघातग्रस्त रुग्णांना तत्काळ वैद्यकीय सेवा
सरकारी रुग्णालयात आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे
मुख्य रस्त्यांवरील पार्किंगवर नियंत्रण
सिनेमा रोड, गांधी चौक, मारवाड पेठ, सातव चौक इ. ठिकाणी ‘नो पार्किंग झोन’ची अंमलबजावणी
नागरिकांनी वार्डनिहाय सूचना घेऊन त्या आधारित उपाययोजना राबवण्याची मागणी करत, प्रशासनाला विश्वासात घेऊन कार्य करावे असे आवाहन केले.
प्रशासनाच्या वतीने आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारण्यात आले असून, लवकरच योग्य पावले उचलण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.