
प्रत्येक क्षेत्रात देशाला अग्रेसर ठेवण्याची प्रेरणा पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या जीवनचरित्रातून- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याला विस्तारित करण्याचा श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा इतिहास -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे, दि. ४: संपूर्ण विश्वात प्रत्येक क्षेत्रात आपला भारत देश पुढे राहील हे आपले जीवन ध्येय असले पाहिजे, यासाठीची प्रेरणा आणि ऊर्जा पहिले बाजीराव पेशवे यांच्या जीवनचरित्रातून मिळते, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.


राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) परिसरातील त्रिशक्ती गेट येथे उभारण्यात आलेल्या पहिले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल (नि.) भूषण गोखले, लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख ले. जनरल धीरज शेठ, एनडीएचे कमांडंट व्हाईस ॲडमिरल गुरचरण सिंग, खासदार मेधा कुलकर्णी, माजी मंत्री रविंद्र चव्हाण, थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचे सचिव कुंदनकुमार साठे आदी उपस्थित होते.

श्री.शाह म्हणाले, पहिल्या बाजीरावांनी तंजावर ते अफगाणीस्तानपर्यंत आणि अफगाणीस्तान ते बंगालमार्गे कटकपर्यंत एका मोठ्या हिंदवी साम्राज्याची स्थापना केली जे छत्रपती शिवरायांचे स्वप्न होते. बाजीरावांनी युद्ध नियोजनातील वेग, रणकौशल्य, रणनीती आणि वीर सोबत्यांच्या साथीने अनेक पराभवांना विजयात रुपांतरीत केले. पालखेडच्या विजयाचा अभ्यास बारकाईने केल्यास हा अकल्पनीय होता हे लक्षात येईल. गुलामीचे निशाण आहे तिथे उध्वस्त करुन स्वातंत्र्याचा दीप लावण्याचे काम त्यांनी यशस्वीपणे केले. देश विदेशातील अनेक युद्धकौशल्यातील अभ्यासू सेनानींनी त्यांच्या युद्धकौशल्याविषयी गौरविले आहे.
युद्धनीतीचे काही नियम हे कधीच कालबाह्य होत नाहीत. त्यात व्यूहरचना, वेग, सैन्याची समर्पण भावना, देशभक्ती आणि बलिदान भाव सैन्याला विजय मिळवून देतो. गेल्या पाचशे वर्षातील या सर्व गुणांचे उत्कृष्ट उदाहरण पहिले बाजीराव पेशवे आहेत. त्यांनी त्यांच्या २० वर्षाच्या काळात मृत्यूपर्यंत लढलेली सर्व ४१ युद्धे जिंकली, असेही गौरवोद्गार केंद्रीय गृहमंत्री यांनी काढले.



महान भारताची रचना ही शिवछत्रपतींची प्रेरणा आहे, असे सांगून केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह म्हणाले, संपूर्ण दक्षिण भारत अनेक शाह्यामुंळे पीडित होता आणि उत्तर भारत मुघल साम्राज्याच्या अधीन होता. अशा परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ हिंदवी स्वराज्याची स्थापनाच केली नाही तर युवक, बालक आदींच्या मनावर स्वराज्याचे संस्कार केले, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर धर्मवीर संभाजी महाराज, वीर ताराराणी, धनाजी- संताजी आदी अनेक वीरांनी स्वराज्याची ज्योत विझू दिली नाही. त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी पहिल्यांदा बाळाजी विश्वनाथ आणि नंतर पहिल्या बाजीरावांची पेशवा म्हणून नेमणूक केल्यानंतर त्यांनी स्वराज्याची तेवत ठेवली.
पहिले बाजीराव यांचे स्मारक बनविण्याची सर्वात उचित जागा कोणती असेल तर ती एनडीएच असेल. कारण येथून येणाऱ्या काळातील देशाच्या तिन्ही सेनादलांचे प्रमुख अधिकारी प्रशिक्षित होऊन बाहेर पडत असतात. येथून बाहेर पडताना श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पुतळा तथा त्यांच्या जीवनकाळाचा अभ्यास करून जेव्हा भविष्यातील सेनानी जातील तेव्हा भारताच्या सीमांना स्पर्श करण्याचे धाडस कोणी करणार नाही. भविष्यात स्वराज्य टिकविण्यासाठी संघर्ष करावा लागल्यास आपली सेना आणि नेतृत्व निश्चित करेल. ऑपरेशन सिंदूर हे याचे उदाहरण आहे, असेही ते म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याला विस्तारित करण्याचा श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा इतिहास -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊ माँसाहेबांच्या मदतीने जनतेला एक करून मुघल साम्राज्याच्या चारही आक्रमकांना सळो की पळो करून सोडले. त्यांनी फुलाविलेल्या स्वराज्याच्या अंगारामुळे अनेक पराक्रमी योद्धे तयार झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याला विस्तारित करण्याचा श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा इतिहास आहे.
त्यांनी लढलेल्या ४१ लढायापैकी एकही लढाईत पराभव स्वीकारला नाही. उत्तरेला काबूलपर्यंत आणि पूर्वेला बंगालपर्यंत मराठी साम्राज्यचा विस्तार करण्याचे काम थोरल्या बाजीराव पेशव्यांनी केले. वेग ही त्यांची सर्वात मोठी रणनीती होती. युद्धासाठी मुघलांची सेना जेव्हा ८ ते १० कि.मी. प्रवास करत तेव्हा बाजीरावांची सेना ६० ते ८० कि.मी. चा प्रवास दररोज करत. पालखेड येथे झालेल्या युद्धाचा उल्लेख रणनितीनुसार सर्वात चांगली लढाई होय असा माँटगोमेरी यांच्यासारख्या सेनानींनी त्यांच्या युद्ध कौशल्याचा गौरव केला आहे, असे श्री. फडणवीस यांनी नमूद केले.
इंग्रजांनी आणि त्यानंतर काही प्रमाणात स्वकियांनी देखील आपल्या इतिहासातील अनेक नायकांवर अन्याय केला आणि आपल्या हिंदवी स्वराज्याचा आणि मराठी साम्राज्याचा इतिहास त्यांनी आपल्या इतिहासातच विलीन करुन टाकला. त्यामुळे आपल्या अनेक महानायकांचा विसर आपल्याला पडला. परंतु, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात या नायकांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा आता प्रयत्न सुरू आहे. थोरले बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्यासाठी जिथे देशाच्या संरक्षण सज्जतेचे प्रशिक्षण दिले जाते अशा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीसारख्या ठिकाणापेक्षा दुसरे योग्य स्थान नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
एअर मार्शल (नि.) भूषण गोखले यांनी प्रस्ताविक केले. एनडीए येथे महान राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा समोरच असून बाजूला महाराजा रणजितसिंह, पहिले बाजीराव पेशवे, नरवीर तानाजी मालुसरे यांचे अश्वारूढ पुतळे आहेत. ते येथील प्रशिक्षणार्थी कॅडेटला प्रेरणा देतात. बाजीराव पेशव्यांनी त्यांच्या जीवनकाळात सर्व युद्धे जिंकली. त्यामुळे हा पुतळा येथे उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, असे ते म्हणाले.
विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले, हे स्मारक पराक्रमाचे, पराक्रमातून निर्माण होणाऱ्या प्रतिरोधाचे स्मारक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी भारतीय इतिहासात पराक्रम गाजविला आहे. भारतीय भाषाच नव्हे तर जगातील भाषांत हा इतिहास पुढे आणला पाहिजे, असेही ते म्हणाले.
0000