पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

0
150

पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

पुणे, दि. ३१ : कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन २०२३ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या पिकांसाठी आयोजित पीक स्पर्धेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

राज्यात पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत गौरव करुन प्रोत्साहन देण्यासाठी पीकस्पर्धा राबविण्यात येते. पीक स्पर्धा तालुका स्तर, जिल्हास्तर व राज्यस्तरावर आयोजित करण्यात येणार असून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.

स्पर्धेत भाग घेण्यासाठी सर्वसाधारण गटास ३०० रूपये व आदिवासी गटासाठी १५० रूपये प्रमाणे प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र प्रवेश शुल्क असेल. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असावी व तो स्वत: कसत असावा. एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत भाग घेता येईल. स्पर्धकाची स्वतःच्या शेतावर त्या पिकाच्या बाबतीत किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

अर्जासोबत विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२, ८-अ चा उतारा, आदिवासी असल्यास जात प्रमाणपत्र, शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खात्याच्या चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक राहील.

सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी पीकनिहाय बक्षीस तालुका पातळीवर प्रथम क्रमांकासाठी ५ हजार, द्वितीय ३ हजार व तृतीय क्रमांकासाठी २ हजार रुपये, जिल्हा पातळीवर अनुक्रमे १० हजार, ७ हजार व ५ हजार रुपये तर राज्यपातळीवर प्रथम ५० हजार, द्वितीय ४० हजार तसेच तृतीय ३० हजार रुपये बक्षीस असेल.

या योजनेबाबत अधिक माहितीसाठी https://krishi.maharashtra.gov.in या कृषी विभागाच्या संकेतस्थळावर किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) दिलीप झेंडे यांनी केले आहे.
0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here