Homeलेखखांडोळी - सणस्मरणीय कथा.... लेखक :अण्णा धगाटे

खांडोळी – सणस्मरणीय कथा…. लेखक :अण्णा धगाटे

खांडोळी - सणस्मरणीय कथा.... लेखक :अण्णा धगाटे

खांडोळी

पिराजी केकताडाच्या ताटीतल केकताडाची पान साळत होता. हातातल्या कत्तीचा स्पर्श पानाला झाला की,पान त्यांच्या बुंध्यापासुन वेगळं होतं होत एवढेच काय माशी देखील त्या कत्तीवर बसताना विचार करीत होती.

काळ्या काताळासारखा पिलाजी केवळ रंगानेच दिसायलाच काळा पाषाण जरी होता.तसा पाषाणाला हि पाझर फुटतो असा होता.त्या निरव शांततेत एका महिलेच्या हुंदक्याचा विनवनीचा आवाज त्याच्या कानावर पडला. त्याने कानोसा घेतला.एका बाई माणसाचा तो हुंदका होता.पिलाजीला आता राहवले नाही.ससाण्या सारख्या तीक्ष्ण नजरेने त्यानं त्या नजरेआड आलेल्या केकताडाच्या सोटाला दुर सारुन पाहिले.

पाहतो तर काय दामु सावकार त्या बाईशी लगट करीत होता.खुरपायला आलेल्या बाया बरच तन काढुन रान उरकुन घराकड झपाझप पावलं टाकत होत्या.शेतातल तन काढणं सोपं होतं पर दामुच्या मनातल अंगावर उतणार तन त्यांना काढता येत नव्हतं ते अंगावर कधी उतेल यांचा भरवसा नव्हता.त्यामुळे त्या अंगावर घेतलेले काम पुर केलं की,काढता पाय घेत होत्या.त्यांची पाऊले झपाझप पडत होती तरी त्या मधुन मधुन माग वळुन पाहत होत्या.

त्या अबलेची नजरपण त्यांच्यावर होती.टाहो फोडुन आवाज द्यावा असं तिला वाटतं होतं आवाजासाठी तिनं मानवर करताच दामु सावकार मानेवर कुऱ्हाड ठेवीन म्हणत तिला धमकावत होता.

हे सार पिलाजीन आता नजरेच्या टप्यात टिपलं होत त्यान आता क्षणाचाहि विलंब न करता त्या केकताडाच्या ताटीतुन उसळी मारली. कमरला फरशी खोवलेल्या पिलाजी दामु सावकारापुढ उभा पाहताच दामु सावकार गर्भगळीत झाला होता. तशातच तो उसन आवसान आणत स्वतःला सावरत होता.कारण तो लिंग पिसाट झाला होता. हे पाहुन पिलाजी दामु सावकारावर डाफरला.

वासनांध दामु सावकारान त्या बाईला खुनवल अन चढ्या आवाजात म्हणाला,”चल गावाच्या चावडीवर अन् सांग हा पिलाजी माझ्यावर अति प्रसंग करायला आला होता.”ती भयभीत झाली होती.सावकाराला व्हय व्हय म्हणत नजर चुकवित तिन पिलाजीला डोळ्याने खुणवल तिचं ते खुणवन पाहून पिलाजीला क्षणभर चिड आली.तो मनात म्हणाला बाईच शिंदळकी दिसते. कुठुन या भानगडीत पडलो,हा इचार त्याचा मनात घोळत असतानाच तिने पुन्हा नजरेनं खुणवल

पाहतो तो काय दुरवर असणाऱ्या दामु सावकाराचा गडी तिच्या मुलांचा गळा दाबत होता.ते पाहताच पिलाजीला मनात ममत्व जाग झालं,साऱ्या विचारानं पलटी मारली व गरुडझेप घ्यावी तशी झेप त्यान घेतली.कत्तीचा वार त्या गाड्यांच्या हातावर केला.खरबुजाची खाप काढावी तसा त्यांच्या दंडाचा लचका पिलाजीन घेतला होता.दामु सावकाराच्या गड्याच धुड जमिनीवर कोसळतात

पिराजी म्हणाला,बाय त्या लेकराला घे,मी या दाम्याच्या आता मुसक्या आवळतो.म्हणत फौजदारान गुन्हेगारांचे दंड काढण्या बांधुन आवळावे.तसे दाम्याचे दंड आवळले‌.पिलाजीन त्या बाईला अन‌ लेकराला घोड्यावर बसवलं.घोड दुडकी चाल चालत होतं.

दाम्या पुढं अन् फौजदारावानी पिलाजी मांग चालत होता.हे पाहताच कडुस पडुन धरती अंधाराच्या कुशीत शिरत होती.तरी गाव चावडी जवळ जमा झाला होता.पाटील, कुलकर्णी,शेंबडी,नागडी पोर सारी जमा झाली.

लेकराची मान आवळीत पिलाजीवर तोहमत घ्यायला सांगणारा दामु आता बर्फागत गार झाला होता.पिलाजी सांगत होता सावकारान बाईच्या अब्रुला हात घातला होता. तशी पंच मंडळी उलट पिलाजीला दरडावत होती.अब्रु तर घेतली नाय ना!समर्था घरचे श्वान त्याशी सर्व देती मान सावकाराच्या ओझ्याखाली गाव दबलेल्या होता.मिटामिट करुन दामु सावकाराला गावानं तंबी देऊन मोकाट सोडला होता.

चोर सोडुन संन्याश्याला फाशी द्यावी.तस त्या बाईवरच गाव तुटुन पडला होता.ती काकुळतीला येऊन सांगत होती.आम्ही गावातल्या बाया सावकाराच्या वावरात खुरपाया जातो.रोजावर काम न करता अंगावर काम वाटुन घेतो. लेकराला बरं वाटतं नाय म्हणुन लेकरु किरकिर करीत होत.माझ रान खुरपायच राहील होत. बरोबरच्या बाया दोन पाऊल पुढं जाऊस्तवर लगबगीन खुरपुन मी पर निघल म्हणुन मी खुरपत होते.काम पुर झाल्या शिवाय मजुरी मिळत नाय म्हणुन मी बिगीबिगी हात चालवत होते.
तोच या सावकार डाव साधला.

धुरपती साठी किसन देवानं धावुन यावं तसा हा दादा आला नाय तर त्या उघड्या रानावर माझी पर अब्रु उघडी पडली असती या दादानं येऊन हे गबाळ खुरपुन काढलं.म्हणुन माझी अब्रु शाबुद राहिली गावकऱ्यान तोंडसुख घेऊन‌ तिला सोडुन दिल.

पिलाजी मांगवाड्यात आला.दिवसभरच सार विसरुन गेला.एवढंच काय दामु सावकारच्या गड्याच्या दंडाचा लचका तोडलेल्या रक्तान माखलेली कत्ती धुतली‌ शांत झोपला.

सकाळी नाष्टा पाणी करुन‌ केकताड साळायला गेला.त्याच्या समोर पंचक्रोशीतल्या चारपाच साळकाया माळकाया जमा झाल्या,बायाबापड्याची अब्रु वाचविणारा गब्रु मांगवाड्यात हाय त्यामुळं दामु बद्दलची मनातली भिंती दुर झाली होती.
त्या सांगु लागल्या. पिलाजी दादा त्या सैतानान आजवर आमच्या इज्जतीची राखरांगोळी केली. पोटाची भुक लई वंगाळ असते.रोजीरोटीसाठी आम्ही त्यांच्या शेतात जातो.त्याच्या शेतात गेलो नाय तर तो दुसऱ्याच्या पर शेतात काम करु देत नाय,डोळ्यात आसव आणुन त्या सांगत होत्या.

पिलाच्या तळपायाची आग मस्तकात जात होती.तो एकच शब्द बोलत होता माझ्या माऊल्या हो,बस आता खांडोळीच,त्या निघुन गेल्यावर पिलाजीच्या मनात एकच विचार घोळत होता.

कोल्ह्याकुत्र्याच मरण त्याला द्यायच कुठ मारुन टाकलं तर आज ना उद्या हे मढ वास करील तो वास आपल्याला शोधीत येईल.पिलाजीच मढ त्याच्या घरच्यांना रडायला देखील दिसु द्यायचं नाय

पिलाजीनी तट्याची गाडी तयार केली.सुंदरा तमासगिरीन त्यात बसवली ती गाडी गावाची खालची आळी,वरची आळी करीत अख्या गावभर फिरून दामु सावकाराच्या घराजवळ थांबली.सुंदराच पाहुन ते रुप!जाग झालं दामुच्या मनातल पाप! दामु बसला सुंदरीच्या छकड्यात !अडकला सुंदराच्या लफड्यात दामुच्या मनात सुंदराच रुप भरत होत! पिलाजीच्या मनात दामुच कुकर्म सलत होतं!दामु सुंदरा बरोबर गाव सोडुन गेला साऱ्या गावानं हाच गोड गैरसमज करुन घेतला होता.पर दामुन आजवर बायाबापड्याच्या आयुष्याचा जो तमाशा मांडला होता.त्याचा वग आता पिलाजीन लिहला होता.

याच सुंदराला पिलाजीन आधी दामुच्या शेतात नेली होती.परींदा दाना देखता जाल नही.दामु सुंदरावर घालणार झडप तोच पिलाजीच्या फरशीन दामुच्या त्या लिंगपिसाट शरीरावर वार केले. सपासप!त्याच क्षणी दामु पडला गप!

कसाबान जित्राबाची खांडोळी करावी.तशी दामुची खांडोळी पिलाजीन केली.त्यांच्या मढ्याची बोटी बोटी केली घारी गिधाडांना कोल्ह्या लांडग्याला खाऊ घातली.कुत्र्याच्या नजरेला त्यांची बोटी पडुन दिली नाही.पिलाजीला ठावुक होत कुत्रं इमानी असती पर ते गावाशी इमान राखेल की,आपल्याशी यांचा भरवसा नाय त्यांच्या तोंडातली एक बोटी भी दामुच्या मढ्याला वाचा फोडील.

दामुच्या मढ्याला मुठ माती देऊन या पवित्र मातीत त्याचा देहाच काय त्यांची राखपर मिसळु द्यायची नाय

त्याच्या देहाची खांडोळी मातीत घोळुन घेतली रगात अन् माती एक झाली होती.ती पर धुवुन काढली.ती खांडोळी बारदानात भरुन वर दामुच मुंडकं ठेवुन शालीन पांघरुन घेतल्यागत दामुला शालु नेसलेल्या सुंदराच्या शेजारी बसवला होता.

दामुच्या त्या गाव सोडुन जाण्याने बायाबापड्यानी श्वास सोडला होता.तर काहींचा बाप्याचा जीव गुदमरला होता.आता अडीनडीला कोणाच्या दरवाज्यावर जायचं दामु वसुलीसाठी दारावर यायचा पर वेळ तर भागत होती.आता अडी नडीला करायचं काय या विचारानं काही जण खंगत चालली होती.

तर काही जण दामुच्या शोध घ्यायला वाट चालत होते.पिलाजीन बायाबापड्याच्या वाटेमधला काटा दुर सारला होता.त्याच्या देहाची खांडोळी करुन कोल्ह्याकुत्र्याना दिली होती.आजवर बायाबापड्याच्या अब्रुचे लचके तोडणाऱ्या दामुची लचके आता कोल्ह्यीकुत्र्यी तोडत होती दामुच्या आयुष्याच्या तुणतुण्याची तार त्याच तुणतुणं वाजवुन पिलाजीन तोडुन टाकली होती.त्याच्या देहाची खांडोळी! रंजल्या गांजल्या बायाबापड्यानी पाहीली होती.याची देही याची डोळी!

कुठली सुंदरा अन् कुठलं काय पिलाजीन केली होती खेळी ! दामुचा घेतला होता बळी!धनाच बळ जरी दामुच्या अंगात होत तरी बळी तो कान पिळी खांडोळी करणारा पिलाजी सरस ठरला होता.पिलाजी एकच शिकला होता.अन्यायावर तुटुन पडा!उन्मादाची मुडदा पाडा!अंगावर घेऊन घ्या त्याचा बळी! करा त्याची खांडोळी!

आण्णा धगाटे जेष्ठ साहित्यिक सामाजिक कार्यकर्ता

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on