पुणे
भारताची जनगणना २०२७ – घरयादी व घरगणना: लोकशाहीच्या बळकटीची भक्कम पायाभरणी
पुणे, दि. १ (जिमाका वृत्तसेवा) – देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी भारताची जनगणना २०२७ ही ऐतिहासिक परंपरेला पुढे नेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिक सक्षम स्वरूपात राबविण्यात येणार आहे. जगातील सर्वात मोठ्या प्रशासकीय उपक्रमांपैकी एक असलेली ही जनगणना देशाच्या नियोजन प्रक्रियेचा कणा मानली जाते. ती आता सुरु होत आहे. जनतेनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
भारतीय राज्यघटनेच्या सातव्या अनुसूचीतील केंद्रीय यादीमध्ये अनुक्रमांक ६९ अंतर्गत जनगणनेचा समावेश असून, जनगणना अधिनियम १९४८ द्वारे या प्रक्रियेला कायदेशीर अधिष्ठान प्राप्त झाले आहे. भारतातील जनगणनेला सुमारे १५० वर्षांची परंपरा असून १८७२ मध्ये पहिली जनगणना झाली, तर १८८१ पासून ती नियमितपणे दर दहा वर्षांनी घेतली जात आहे. कोविड-१९ महामारीमुळे २०२१ ची जनगणना पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे २०२७ ची जनगणना ही १६ वी आणि स्वातंत्र्यानंतरची ८ वी जनगणना ठरणार आहे.
जनगणना ही गाव, शहर आणि वॉर्ड स्तरावरील लोकसंख्येची व सामाजिक-आर्थिक स्थितीची सखोल माहिती देणारा सर्वात मोठा स्रोत आहे. घरांची स्थिती, सुविधा, शिक्षण, रोजगार, भाषा, स्थलांतर, धर्म, अनुसूचित जाती-जमाती यांसारख्या विविध घटकांवर आधारित माहिती शासनाच्या धोरणनिर्मितीसाठी अत्यंत उपयुक्त ठरते.
जनगणना २०२७ ही दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिला टप्पा म्हणजे घरयादी व घरगणना (Houselisting & Housing Census) हा १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यान होणार आहे. या टप्प्यात इमारती, घरे व कुटुंबांची ओळख पटवून त्यांची नोंद केली जाईल. तसेच घरांमधील सुविधा, मालमत्ता व निवासाच्या स्थितीबाबत माहिती संकलित केली जाईल. प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशाने निश्चित केलेल्या एका महिन्याच्या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
दुसरा टप्पा म्हणजे लोकसंख्या गणना (Population Enumeration) हा फेब्रुवारी २०२७ मध्ये देशभर (बर्फाच्छादित क्षेत्र वगळता) राबविला जाईल. या टप्प्यात प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक माहिती गोळा करण्यात येईल. बर्फाच्छादित भागांमध्ये ही प्रक्रिया सप्टेंबर-ऑक्टोबर २०२६ मध्ये पूर्ण केली जाईल.
यंदाच्या जनगणनेत ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमाशी सुसंगत डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येणार आहे. गणकांकडून माहिती संकलनासाठी ‘HLO मोबाईल अॅप्लिकेशन’चा वापर केला जाणार असून यामुळे माहिती संकलन अधिक जलद, अचूक व पारदर्शक होईल. कागदी कामकाज कमी होऊन वेळ व श्रमाची बचत होणार आहे. तसेच नागरिकांसाठी https://se.census.gov.in या संकेतस्थळाद्वारे स्व-गणना (Self-Enumeration) करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इंग्रजी, हिंदीसह १४ प्रादेशिक भाषांमध्ये ही सेवा उपलब्ध असून कुटुंबातील कोणताही सदस्य सुमारे १५-२० मिनिटांत माहिती भरू शकतो. स्व-गणना पूर्ण झाल्यानंतर मिळणारा आयडी गणकाला देणे आवश्यक राहील, ज्याद्वारे पडताळणी व अंतिम नोंदणी केली जाईल.
या राष्ट्रीय उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व शासकीय विभाग, संस्था व नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. जनगणना ही केवळ आकडेवारी नसून देशाच्या विकासाचा पाया आहे. नागरिकांचा सहभाग जितका व्यापक, तितकी लोकशाही अधिक सक्षम होईल.



