पर्युषण पर्व : मनातील विकारांचे शमन…

पर्युषण पर्व : मनातील विकारांचे शमन…

0
109

पर्युषण पर्व : मनातील विकारांचे शमन…

सुख तो सुबह के
जैसा होता हैं,
मांगने से नही,
जागने से मिलता हैं।

    जैन समाजाच्या महत्वपूर्ण व्रत/पर्व असे पर्युषण पर्वला सुरुवात झाली आहे. मनातील सर्व विकारांचे शमन करणे म्हणजेच प्रामुख्याने काम, क्रोध, लोभ, मोह, वैमनस्य या विकारांपासून दूर राहून स्वत:ला शांती प्राप्त करुन घेणे, असे या व्रताचे महत्त्व जैन संप्रदायातील उपासकांसाठी सांगितलेले आहे. यालाच पर्युशमन (मनातील विकारांचे शमन करणे), पर्वराज व महापर्व अशीही नावे आहेत. थोडक्यात आध्यात्मिक प्रगती साधून शांतता प्राप्त करावी हा उद्देश प्रामुख्याने आढळतो. तर आध्यात्मिक प्रगती कशी करावी, कोणते नियम पाळावेत या बाबतचे प्रबोधन संत, मुनी करीत असतात.
       जैन संप्रदायात श्वेतांबर आणि दिगंबर अशा दोन शाखा आहेत. त्यापैकी श्वेतांबर उपासक हे पर्युषण पर्व आठ दिवस पाळतात. याला अष्टहिक असे म्हटले जाते. अनंत चतुर्दशीला या व्रताची सांगता होते.
       दिगंबर जैन एकूण दहा दिवस या व्रताचे पालन करतात. भगवान महावीर यांनी केलेल्या दहा उपदेशाचे स्मरण या दिवसात केले जाते. तर पाचव्या दिवशी महावीर जयंती साजरी केली जाते. याला ‘दक्षलक्षण पर्व’ असेही म्हणतात.
       या व्रताच्या काळात पाच नियमांचे पालन करतांना अंहिसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य ही पाच तत्त्वे पाळली जातात. तसेच जैन मुनींचे उपदेशाचे, दान धर्माचे व इतर आध्यात्मिक कार्यक्रम केले जातात. तर उपवास आणि त्याग या माध्यमातून आत्मशुध्दी करता येते, हे पटवून दिल्या जाते.

या व्रताच्या अखेरच्या दिवसाला ‘संवत्सरी’ म्हणतात. ‘क्षमा’ हे वीरांचे भूषण आहे, असे भगवान महावीर यांनी आपल्या उपदेशात सांगितले आहे. याला अनुसरुन या पर्वाच्या सांगतावेळी उपसकाने सर्वांची क्षमा मागणे याला विशेष महत्त्व आहे. तेव्हा ‘मिच्छामी दुक्कडम’, म्हणत संबंधितांची क्षमा मागण्याची पध्दत आहे.
जैन आचार्य उमास्वामी व्दारा रचित तत्वार्थ सूत्र या ग्रंथात दोन संकल्पना मांडल्या आहेत. व्यवहार आणि निश्चय. व्यवहार मध्ये बाह्य जगाशी जुळवून घेत शांततामय आयुष्य जगणे, याला महत्त्व दिले गेले आहे. तर निश्चय मध्ये आंतरिक समृध्दि वाढविणे आणि स्वत:चा विकास करणे याला महत्त्व दिल्या गेले आहे.
प्रत्यक्षात जैन समाजाबद्दल त्यांच्या खाणे-पिण्याच्या, व्रत, संस्कृती, राहणीमान व व्यवसायातील सचोटी याबद्दल आदराने बोलले जाते. संध्याकाळपूर्वी जेवण, अन्नाचा कण वाया न जाऊ देणे, कांदा, लसणचा तसेच मांसाहाराचा त्याग, दैनंदिन पूजा वगैरे अनेक गोष्टीची चर्चा व्यवहारात होत असते आणि याबाबत त्यांची उदाहरणे अनेक वक्ते, आहार तंज्ञ देत असतात.
प्रत्यक्षात उपरोक्त सर्व बाबी कमी जास्त प्रमाणात सर्व धर्मातील संत, महात्मे, ग्रंथ व शास्त्र सांगतात. तरीही समाजात या विरुध्दच घडतांना दिसतं, ही खरी चिंतेची बाब आहे. दारुची दुकाने, गुटखा-तंबाूख-सिगारेट व इतरही प्रकारची व्यवसनाधिनता वाढते आहे. दवाखाणे व वृध्दाश्रम वाढत आहेत. हिंसा, सामाजिक तेढ, शिव्या शाप देणे आदी वाढत असून एकूणच शांतता धोक्यात आली आहे. प्रत्येकाला मानसिक ‘शांती’ हवी मात्र प्रयत्न तर ‘शांती भंग’ होण्याचेच सुरु आहेत. त्यामुळेच प्रत्येक व्यक्ती, कुटुंब व समाजात सुखापेक्षा दु:खाचे प्रसंग, घटना व प्रकार वाढत आहेत. जगात सुखी कोण? पेक्षाही कुटुंबात सुखी कोण? असा प्रश्न महत्त्वाचा ठरत आहे.
वास्तविक ‘पर्युषण पर्व’ हे एक निमित्त आहे. ज्ञान प्राप्ती करुन सुखी होण्याचे. तर अशा ज्ञानाची कुणा एका धर्माच्या व समाजाच्या नव्हे तर प्रत्येकालाच गरज आहे. शेवटी आयुष्यात ‘शांती’ मिळावी हे सर्वांचेच ध्येय असते आणि माझ्याकडे खूप काही असावे आणि मग शांती असावी, ही अपेक्षा असते. मुळात ही अपेक्षा चुकीची असून त्याग, सेवा, समर्पण व समाधान यातूनच ‘शांती’ मिळू शकते, आणि याच शिकवणची आठवण हे ‘पर्युषण पर्व’ दरवर्षी सर्वांनाच देत असते, असे म्हणावे लागेल. मात्र किती लोक या मार्गाने प्रत्यक्ष चालतात व सुखी होतात? हा खरा प्रश्न आहे.
शेवटी कर्माचा सिध्दांत हाच खूप महत्त्वाचा मानला गेला आहे. दोन ओळी आठवतात…
चाहते हो अगर की खुदा मिले,
तो कुछ कर्म ऐसे कर जिससे दुआ मिले…

               राजेश राजोर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here