बारामतीत कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा; नागरिक संतप्त
बारामती शहरात सध्या कचरा व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून अनेक प्रभागांमध्ये कचरा गाड्यांच्या घंटाच ऐकू येत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. गल्लीबोळात दिवसन्दिवस कचऱ्याचे ढीग साचत असून स्वच्छतेचे नियोजन पूर्णपणे ठप्प झाल्याचे चित्र दिसत आहे.
“हरित, सुंदर आणि स्वच्छ बारामती” ही ओळख जपणारे शहर आज चारही बाजूंनी कचऱ्याच्या विळख्यात अडकत चालल्याची चर्चा नागरिकांतून सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने दुर्गंधी, डासांचे प्रमाण आणि आरोग्याच्या समस्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नागरिकांच्या मते, पूर्वी कचरा संकलनाचे नियोजन काटेकोरपणे राबवले जात होते. प्रत्येक प्रभागात नियमित घंटागाड्या फिरत होत्या, स्वच्छतेवर देखरेख होती आणि प्रशासन तत्पर दिसत होते. मात्र सध्या अनेक भागांत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.

याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वच्छ आणि हरित बारामतीच्या संकल्पनेची नागरिकांना आठवण होत आहे. “बारामती स्वच्छ, सुंदर आणि हरित ठेवणे” हा त्यांचा प्रमुख उद्देश होता, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
शहरातील जनतेने आता बारामती नगर परिषद प्रशासनाला थेट सवाल उपस्थित केले आहेत. संबंधित प्रभागातील नगरसेवक, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि नगरपालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून पूर्वीप्रमाणे कामाचे नियोजन, आयोजन आणि संयोजन काटेकोरपणे राबवावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, स्वच्छतेच्या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना न केल्यास नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. “स्वच्छ बारामती”चा दावा केवळ घोषणांपुरता मर्यादित राहू नये, अशी तीव्र भावना आता जनतेतून उमटू लागली आहे.





