तुषार शिवपुजे: बारामती
एक परिपूर्ण आयुष्य जगलेले व्यक्तिमत्व…
श्री. रामकृष्ण लिंबराज सुरवडे (अण्णा) यांना भावपूर्ण श्रद्धांजली
श्री. रामकृष्ण लिंबराज सुरवडे अण्णा यांचे आज कैलासवासी झाले. त्यांच्या जाण्याने बारामतीतील सामाजिक, क्षेत्राला मोठी हानी पोहचली आहे. मात्र त्यांच्या मरणोत्तर देहदानाने त्यांनी समाजापुढे एक थोर आदर्श निर्माण केला आहे. दहा वर्षांपूर्वीच त्यांनी देहदानाचा संकल्प केला होता, आणि त्यांच्या कुटुंबियांनीही त्यांची ती इच्छा पूर्ण केली. बारामतीत समाजातून हे कदाचित पहिलेच देहदान असावे — ही निश्चितच अभिमानास्पद गोष्ट आहे.
अण्णांचं आयुष्य म्हणजे एक प्रेरणादायी संघर्षगाथा.
लहान वयातच मातृ-पितृ छत्र हरपले. मामांनी त्यांचा सांभाळ केला. पुढे बारामतीत आले आणि आयुष्यात पडेल ती कामं करत पुढे गेले. होमगार्ड म्हणून काम करतानाच त्यांनी शिकण्याची आणि घडण्याची संधी साधली. जेव्हा टी. सी. कॉलेजची स्थापना झाली, त्यावेळी अण्णा सुरुवातीपासूनच त्या महाविद्यालयाशी जोडले गेले. आपल्या मेहनतीने आणि निष्ठेने कॉलेजच्या वाढीमध्ये मोठं योगदान दिलं. अखेर रजिस्टार पदावरून ते सेवानिवृत्त झाले.
सेवानिवृत्तीनंतरही अण्णांनी कार्य थांबवले नाही.
शारदानगर कॉलेज, ज्येष्ठ नागरिक संघ, वृद्धाश्रम, कोठारी ट्रस्ट, प्रतिभा नागरी पत संस्था, वीरशैव नागरी पतसंस्था अशा अनेक सामाजिक व आर्थिक संस्थांमध्ये त्यांनी जबाबदारीने काम केले.
पण सर्वात उल्लेखनीय ठरलेलं त्यांचं कार्य म्हणजे वीरशैव लिंगायत समाज ट्रस्टवरील त्यांचं योगदान.
मी तुषार शिवपुजे स्वतः त्यांच्या बरोबर ट्रस्टवर कार्यरत होतो. त्यांनी जबरदस्त शिस्त, पारदर्शकता आणि बांधिलकीने काम केलं. श्री मन्मथ स्वामी मंगल भवन याच्या कामकाजाची सर्व जबाबदारी त्यांनी अतिशय काटेकोरपणे पार पाडली. आम्हा सर्वांना एकत्र करून ओंकारेश्वर बचत गट सुरू केला आणि तब्बल १२ वर्ष त्याचा हिशोब सांभाळला. ओंकारेश्वर सोसायटीच्या कामातही त्यांनी सक्रीय सहभाग घेतला आणि मंदिर उभारणीसाठी भरघोस आर्थिक मदत दिली.
त्यांच्या सामाजिक कार्याची व्याप्ती अफाट होती.
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देणं, समाजातील उपेक्षित घटकांना आधार देणं ही त्यांची जीवनशैलीच होती. त्यांच्या यशस्वी वाटचालीत त्यांच्या समविचारी, समर्पित पत्नी हिरा मावशींचं मोठं योगदान होतं. त्यांचं संपुर्ण कुटुंब हेच त्यांचं बळ होतं — हे ते नेहमी आवर्जून सांगायचे.
गेल्या वर्षभरापासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे अण्णांचं गावात येणं कमी झालं होतं. मात्र आले की हमखास माझ्याकडे यायचे. आज त्यांच्या आठवणींचा ओलावा डोळ्यातून उतरतो आहे… पण त्यांच्या कार्याचा दीपक अजूनही अनेकांच्या आयुष्यात उजळत आहे.
श्री सुरवडे अण्णांनी एक परिपूर्ण, अर्थपूर्ण आणि समाजनिष्ठ आयुष्य जगलं.
त्यांच्या जाण्याने मन सुन्न झालं असलं तरी त्यांनी दिलेला आदर्श आपल्या सर्वांसाठी दीपस्तंभ ठरेल.
अशा या महान आत्म्यास विनम्र श्रद्धांजली!
ॐ शांती शांती शांती।
- एक ऋणानुबंधाने जोडलेला कार्यसाथी.
- तुषार शिवपुंजे - बारामती
भावनगरीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली
