समाज कल्याण विभाग, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताह ! मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन संपन्न .
पुणे (दि.०८/०४/२०२५)- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दिनांक 8 एप्रिल 2025 ते 14 एप्रिल 2025 या कालावधीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
सामाजिक समता सप्ताह उपक्रमाचे उद्घाटन येथील सामाजिक न्याय भवनात आज दि.८.०४.२०२५ रोजी श्रीमती वंदना कोचुरे, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, पुणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी श्री.प्रसाद खैरनार, सहायक आयुक्त, समाज कल्याण पुणे यांच्यासह समाज कल्याण विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे दरवर्षी दिनांक 8 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत अनुसुचित जाती, जनजाती व वंचित दुर्बल घटकातील व्यक्तींच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय्य साध्य करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच जनतेमध्ये जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह हा कार्यक्रम राबविला जातो.
पुणे विभागातील सर्व जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण, तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, व जात प्रमाणपत्र पडताळणी समिती या कार्यालयामार्फत या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. समता सप्ताह दिनांक 8 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे त्यामध्ये मंगळवार, दि.०८ एप्रिल, २०२५ ते सोमवार, दि.१४ एप्रिल, २०२५ भारतीय संविधानाची उद्देशिका / प्रस्ताविका यांचे वाचन करून भारतीय जनतेत संविधाना विषयी जनजागृती निर्माण करणे. बुधवार,दि.०९ एप्रिल, २०२५ सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय वसतिगृहे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारीत वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा इत्यादी कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करणे, जिल्हा व विभागीय स्तरावर कार्यक्रमाचे आयोजन करून विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना वाटप करणे, गुरूवार, दि.१० एप्रिल, २०२५ विभागामध्ये समतादूतांमार्फत ग्रामीण व शहरी भागात पथनाट्य व लघुनाटिका या द्वारे सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत जनतेचे प्रबोधन करणे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचे मार्फत प्रत्येक जिल्ह्यात मार्जिन मनी योजनेंतर्गत कार्यशाळा आयोजित करणे, तसेच सदर योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची कार्यशाळा आयोजित करणे, शुक्रवार, दि.११ एप्रिल, २०२५ क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करणे तसेच महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याविषयी वक्ता बोलावून, कार्यक्रमांचे आयोजन करणे, शनिवार, दि.१२ एप्रिल, २०२५ संविधान जागर- भारतीय संविधाना विषयी सर्वसाधारण माहिती देणे जसे की, संविधानाची निर्मिती, संविधान निमिर्ती समिती, अनुच्छेद, विशेषतः मुलभूत अधिकार व मुलभूत कर्तव्ये याविषयी व्याख्यान आयोजित करणे (किमान ६० ते ९० मि.) सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण या कार्यालयात महिला मेळावा आयोजित करून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेल्या कार्याबद्दल माहिती देणारे व्याख्यान आयोजित करणे, रविवार , दि.१३ एप्रिल, २०२५, प्रत्येक जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबीर व ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा आयोजित करणे, तसेच प्रत्येक जिल्हयात जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सहकार्याने विभागातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय वसतिगृहे येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करणे. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने जिल्हयातील सर्व महत्वाच्या ठिकाणी व अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांमधून स्वच्छता अभियान राबविणे, सोमवार, दि.१४ एप्रिल, २०२५ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिनस्त सर्व शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन व इतर कार्यक्रम, व्याख्याने, चर्चासत्र इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करणे, जिल्हास्तरावर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान मेळावा आयोजित करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याबद्दल माहिती सांगणारे व्याख्यान आयोजित करणे. तसेच सदर दिवशी विभागातील सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात Online-Validity प्रमाणपत्र प्रदान करणे हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत अशी माहिती श्रीमती वंदना कोचुरे, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, पुणे विभाग यांनी दिली असून, सदर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन माहिती केले आहे.
