HomeUncategorizedलोकशाही जगवा ! माणुस म्हणुन जगा..!!

लोकशाही जगवा ! माणुस म्हणुन जगा..!!

लोकशाही जगवा ! माणुस म्हणुन जगा

सृष्टी वरील सजीवामध्ये बुध्दीमान प्राणी ज्याला बोलता येते,भावना व्यक्त करता येते.असे असताना आम्ही जगतो का?हा प्रश्न आमच्या पुढे निर्माण का? होत नाही.

लोकशाहीच्या नावावर आज ठोकशाही,बेबंदशाही,घराणेशाही अस्तित्वात आहे.आमच्या अस्तित्वाचा आम्ही विचार करतो का?या देशात टि.एन.शेषन देश प्रेमी कठोर प्रशासन राबविणारे सक्षम अधिकारी जन्माला आले. त्यामुळे तरी आम्हाला राज्यकर्त्यांचे शिक्षण त्यांची गुंडगिरी त्यांची संपत्ती कळु लागली.

यांची,यांच्या मुलाबाळांची बायकांची संपत्ती कोटी कोटी!आज हि आदिवासीला नाही लंगोटी! सामान्य माणसाला नाही रोटी!शिकणाऱ्या विद्यार्थ्यांला नाही पाटी!शिकलेला वणवण फिरतो उपाशीपोटी! अस्मानी सुलतानी संकट शेतकऱ्यांच्या सदैव ललाटी!सामान्य माणसाची जगण्याची असते कसोटी!
भ्रष्टाचार करुन कोटी कोटी !राजकारणी मारतात इकडुन तिकडुन कोलांटी!हे सारे चित्र आम्ही उघड्या डोळ्याने एखादा चित्रपट पाहुन नामानिराळे राहावे तसे राहत असतो.परंतु मी या धरतीवरचा माणुस म्हणुन जगणारा नायक आहे.झुंझार माणसा झुंज देत हे आम्हाला का कळत नाही.

आम्ही केवळ करीत असतो चर्चा राजकारणी बळकावत असतात खुर्चा त्यांच्या एकेक ऐश्वर्याच्या खुर्चीचा भुर्दंड आम्हा भोगावा लागतो यांचा कधी आम्ही विचार करतो.का?

आम्ही सकाळी उठल्यापासुन मुखमार्जनसाठी ते रात्री झोपताना जे अंथरुण पांघरुण घेतो.त्यावर आम्ही कर भरतो.त्यावर भरते देशाचे तिजोरी! त्यावर जगतात राजकारणी माजोरी!राज्यकर्ते शासनकर्ते म्हणुन असते त्यांची मुजोरी! इंद्राचा ऐरावत असतो त्यांचे घरीदारी!आम्हाला मात्र जगतो करुन मोलमजुरी!उन वाऱ्यात राबत असतो शेतकरी !नोकरीच्या शोधात सुशिक्षित बेकार झिजवित असतो कारखान्याची पायरी!आमची तरुणाई जगते राजकारण्याची करुन हुजरेगिरी!भ्रष्टबुध्दीने जगतो आम्ही मेंढरापरी!का होणार नाहीत राजकारणी भ्रष्टाचारी! अशी हि लोकशाहीची तऱ्हाच न्यारी!

या देशात बुध्दाने महावीराने शांतीचा संदेश दिला,क्रांतीकारी लहुजी, वासुदेव फडके झाशीची राणी लक्ष्मीबाई,तात्या टोपे,टिपु सुलतान यांनी परकिय शक्ती विरुद्ध लढण्याचे शिकवले. भगतसिंग,सुखदेव,चंद्रशेखर, सुभाषचंद्र बोस यांनी देशप्रेम शिकविले.गाडगेबाबानी अंधश्रध्दा दुर केली.महात्मा गांधी यांनी अहिंसा शिकविली.शाहु फुले आंबेडकर यांनी सामाजिक समतेचा मार्ग दाखवला.छत्रपती शिवाजी महाराजानी रयतेचे राज्य काय असते ते दाखवुन दिले. ज्ञानोबा तुकोबानी संतांच्या मांदीयाळीतुन मानवता धर्म सांगितला.ठायी ठायी आमचे प्रबोधन संत,महंत,विचारवंत यांनी केले.तरी आम्ही धर्माची, राजकारणाची अफुची गोळी खाऊन धर्माचे राजकारणाचे नशेखोर म्हणुन जगत आहोत.

मोगल सत्तेची,ब्रिटिशांची गुलामगिरी आमच्या डिएनए मधुन अद्याप गेल्याचे दिसत नाही.राजकिय नेत्याला,साहेब म्हणतो,त्याच्या बायकोला वहिनी साहेब त्याच्याआईला आईसाहेब मुलाला बाळासाहेब म्हणत असतो.आमची पोरं म्हणजेच कार्टी हे केवळ कार्यकर्तेच म्हणजेच राज्यकर्त्यांच्या पायीची वहाण पायी बरी असे कार्यकर्ते नेत्यादारी असतात.सोयरेधायरे मात्र राजकिय आसनावरी! का,हि जाण होऊ द्या.

जुने संस्थानिक जाऊन खरे ते संस्थानिक नव्हते.तर मांडलिक होते.तसे आजचे राज्यकर्ते दिल्ली दरबाराचे मांडलिक होऊन लाचारीने सत्तेची ऊब घेऊन जगत असतात.एकाच घरात तीन तीन खासदार काका,मामा,पुतण्या, नातु मुलगी सुना सारेच राजकारणात आम्ही मात्र जातीपातीच्या धर्माच्या समाजकारणात एक दुसऱ्यावर कुरघोडी करत असतो.व घोडीला घोडा लावुन राजकारणी घोड्यावर स्वार होत असतो.

आज भासविले जाते पंच्याऐंशी कोटी लोकांना रेशन,वृध्दाना शेतकऱ्यांना सवलत अशा घोषणा केल्या जातात खरे तर या सवलत मधील सव,चा हिंदी अर्थ मुर्ख अनाडी असा होतो व‌ लत म्हणजे लाचारीची जडलेली सवय, तेव्हा सवलत नको, तर हक्क द्या कारण आम्ही ठायी ठायी कर भरुन हा लोकशाहीचा डोलारा संभाळत असतो.

१९४७ स्वातंत्र्य पासुनच्या पंचवार्षिकला देशाच्या,राज्याच्या राजकारणात मतदान केले आता येणाऱ्या विधानसभेला तरी जागे होऊन माणुस म्हणुन मतदान करा.जागे झालो नाही तर भुकेल्या कंगाल सोमालिया सारख्या देशात आमची गणना व्हायला वेळ लागणार नाही.दर डोई उत्पन्न दुर राहिले, दर डोई किती कर्ज आहे याचा विचार करा

विधान परिषदे सारखे वरीष्ठ सभागृहाचे ७८ सभासद जे निवडणूकीत पडलेले किंवा नेत्याच्या दारात पडलेले आमचे प्रतिनिधी म्हणुन आम्ही का, पोसतो. यांचा विचार करा.जो पक्ष हि विधान परिषद बरखास्त करु हि हमी देत असेल त्यांनाच मतदान करा.सर्व सामान्यतुन आपले असामान्य लोकप्रतिनिधी निवडा,लोकशाही जिवंत ठेवा. तरच तुम्ही जिवंत माणुस म्हणुन जगु‌ शकता हेच जगायचं शिका मतदान हक्क आहे.
आण्णा धगाटे जेष्ठ साहित्यिक सामाजिक कार्यकर्ता

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on