महाराष्ट्राच्या कांदा उत्पादक जिल्ह्यातील सरपंचांची दिल्लीत परिषद…!

0
20

‘एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’ अंतर्गत ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’ च्यावतीने

महाराष्ट्राच्या कांदा उत्पादक जिल्ह्यातील सरपंचांची दिल्लीत परिषद

प्रमुख सहा कांदा उत्पादक जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटातून एक याप्रमाणे 443 विद्यमान सरपंचांचे शिष्टमंडळ दिल्लीला जाणार

अभ्यासपूर्ण ‘कांदा अहवाला’चे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री श्री.नितीनजी गडकरी,केंद्रीय वाणिज्य मंत्री मा.श्री.पियुषजी गोयल व केंद्रीय कृषी मंत्री मा.श्री.शिवराजसिंगजी चव्हाण यांना सादरीकरण

उपक्रमाला महाराष्ट्र शासनाचे
समन्वय सहकार्य लाभावे यासाठी

आज (4 सप्टेंबर 24) रोजी उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या समवेत मुंबईत विशेष बैठक संपन्न.

01.महाराष्ट्र राज्याच्या 34 ग्रामीण जिल्ह्यांपैकी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, जळगाव आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर हे जिल्हे प्रामुख्याने कांदा उत्पादक जिल्हे आहेत.

02.उपरोक्त सहा कांदा उत्पादक जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी कुटुंब आर्थिक दृष्टया ‘कांदा’ पिकावरच प्रामुख्याने अवलंबून आहेत. कांदा विक्रीतून स्थिर स्वरूपाचा किफायतशीर परतावा मिळणे ही या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची खरी पायाभूत गरज आहे.

03.’एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’ अंतर्गत ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’ च्यावतीने कांदा प्रश्नाचा व त्याच्या निराकारणाचा सर्वांगीण अभ्यास करून अभ्यासपूर्ण ‘कांदा अहवाल’ तयार करण्यासाठी 25 मान्यवरांची तज्ज्ञ समिती संघटित करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्याचे निवृत्त पणन संचालक व निवृत्त साखर संचालक मा.श्री.सुनीलजी पवार हे या समितीचे प्रमुख मार्गदर्शक आहेत. कांदा विक्री विनिमयातून कांदा उत्पादक शेतकरी,कांदा व्यापारी आणि कांदा ग्राहक या तीनही घटकांना योग्य आर्थिक न्याय मिळण्यासाठी केंद्र व राज्य शासनाचे धोरणात्मक सहकार्य स्थिर स्वरूपात कसे लाभेल या प्रमुख उद्देशाने ही समिती ‘कांदा अहवाल’ तयार करीत आहे. या समितीत कांदा विषयाशी प्रत्यक्ष निगडित असणाऱ्या अनुभवी मान्यवरांचीच निवड करण्यात आली आहे.

04.केंद्र शासनाचे वाणिज्य मंत्रालय – Commerce Ministry – हे प्रामुख्याने कांदा विक्री नियोजनाचे धोरण निश्चित करते. म्हणून केंद्रीय कृषी मंत्रालयाबरोबरच केंद्रीय वाणिज्य मंत्रालय, कांदा उत्पादक शेतकरी व कांदा व्यापारी यांच्यात सुसंवाद निर्माण करणे हा या उपक्रमामागील ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’चा प्रमुख उद्देश आहे.

05.’राष्ट्रीय सरपंच संसदे’च्या ‘कांदा तज्ञ समिती’चा अभ्यासपूर्ण अहवाल लवकरच ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री श्री.नितीनजी गडकरी,केंद्रीय वाणिज्य मंत्री मा.श्री.पियुषजी गोयल व केंद्रीय कृषी मंत्री मा.श्री.शिवराजसिंगजी चव्हाण यांना दिल्ली येथे सादर करण्यात येईल.

06.’कांदा उत्पादक जिल्ह्यातील ‘सरपंच’ हा कांदा उत्पादकांचा खरा लोकप्रनिधी आहे. ‘कांदा अहवाल’ सादरीकरणासाठी महाराष्ट्राच्या कांदा उत्पादक सहा जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटातून एक याप्रमाणे (नाशिक 73, अहमदनगर 75, जळगाव 76, पुणे 75, सातारा 70 व सोलापूर 74) 443 विद्यमान सरपंचांची निवड करण्यात आली आहे.कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून हे सरपंच कांदा तज्ञ समितीतील 25 सदस्यांसोबत दिल्लीत केंद्र शासनाला ‘कांदा अहवाल’ सादर करतील,असे नियोजन करण्यात येत आहे.

07.’राष्ट्रीय सरपंच संसदे’च्या ग्रामविकास तज्ञ समितीचे नाशिक जिल्हा अध्यक्ष श्री.केदाजी आहेर, प्रसिद्ध विधीज्ञ ऍड.शिशिरजी हिरे, प्रसिद्ध कांदा निर्यातदार मालेगावचे श्री.राजेंद्रजी देवरे व कळवणचे श्री.हेमंतदादा बोरसे (नाशिक जिल्हा), ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’चे महाराष्ट्र राज्य संघटक डॉ.नामदेवराव गुंजाळ व अहमदनगर जिल्हा अध्यक्ष श्री.सितारामजी राऊत (अहमदनगर जिल्हा), जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री.अजयजी पाटील (जळगाव जिल्हा), पुणे जिल्हा अध्यक्ष श्री.कालिदासजी वाडेकर(पुणे जिल्हा),सातारा जिल्हा अध्यक्ष श्री. विक्रमसिंह जाधव (सातारा जिल्हा) व पश्चिम महाराष्ट्र – मराठवाडा प्रांत अध्यक्ष ऍड. विकासजी जाधव (सोलापूर जिल्हा) हे या उपक्रमाचा जिल्हानिहाय प्रमुख समन्वयक करतील.

08.’ राष्ट्रीय सरपंच संसदे’ला सरपंचांच्या नेतृत्वाखाली ‘कांदा अहवाल सादरीकरण’ हा पूर्णपणे अराजकीय व केवळ शेतकरी हिताचा पारदर्शक कार्यक्रम दिल्लीत यशस्वी करता यावा यासाठी महाराष्ट्र शासनाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभावे यासाठी ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’चे प्रमुख समन्वयक श्री.योगेश पाटील,सहसमन्वयक श्री.प्रकाशराव महाले व नागपूर विभागाचे अध्यक्ष श्री.विनय दाणी यांनी आज (04 सप्टेंबर 24) रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांची विशेष भेट घेतली, उपक्रमाचा उद्देश, संकल्पना व नियोजन याविषयी त्यांना पूर्ण माहिती दिली, उपक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभावे अशी विनंती केली. उपक्रम संकल्पनेच्या नियोजनाचे कौतुक करून श्री.देवेंद्रजी फडणवीस यांनी या उपक्रमाच्या प्रत्येक टप्प्यावर आवश्यक असणारे सहकार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here