बारामती कृषी बाजार समितीतून आंबा थेट लंडनला – निर्यातीत नव्या उंचीची भरारी!
बारामती: महाराष्ट्राच्या सुपीक मातीतील सुवासिक आंब्याला जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला, जेव्हा बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जळोची उपबाजार येथील निर्यात सुविधा केंद्रावरून यंदाच्या हंगामातील पहिला आंब्याचा कंटेनर थेट लंडनकडे रवाना झाला. बाजार समितीचे सभापती विश्वासराव आटोळे यांच्या हस्ते शुभारंभ करून या निर्यातीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
१५ वर्षांची यशस्वी परंपरा, नव्या संधींचे दार उघडले
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टीतून २००७ साली स्थापन करण्यात आलेल्या या निर्यात सुविधा केंद्राचा लाभ आज हजारो शेतकऱ्यांना होत आहे. २०१४ पासून बारामती बाजार समितीच्या अंतर्गत चालणाऱ्या या केंद्रातून दरवर्षी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आंबा निर्यात केला जातो. यंदाच्या हंगामात पहिल्या टप्प्यात १० टन आंब्याची लंडनला निर्यात करण्यात आली असून, पुढील टप्प्यात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि चीनमध्येही निर्यात वाढवण्याचे नियोजन आहे.
नव्या प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना अधिक संधी
सध्या जळोची येथे मॅग्नेट प्रकल्पांतर्गत आधुनिक फळे व भाजीपाला हाताळणी केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रामुळे परिसरातील शेतकऱ्यांना जागतिक दर्जाच्या निर्यातीसाठी अधिक संधी उपलब्ध होणार आहेत.
शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी – सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन
यावेळी बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय खतांचा वापर करून उच्च दर्जाचे आणि ‘रिसिड्यू-फ्री’ उत्पादन घेण्याचे आवाहन केले. हे निकष पूर्ण करणाऱ्या आंब्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे.
ग्लोबल ब्रँड बनतोय भारतीय आंबा

रेन्बो इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या निर्यात कंपनीच्या माध्यमातून गेल्या १५ वर्षांत देवगड हापूस आणि केशर आंबा लंडन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि चीनमध्ये पोहोचवला जात आहे. महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात या राज्यांतील उत्कृष्ट दर्जाचा आंबा आंतरराष्ट्रीय मानकांनुसार आकर्षक पॅकिंगमध्ये निर्यात केला जातो.
यावेळी निर्यातदार अभिजित चंद्रकांत भसाळे यांनी सांगितले की, “सध्या पहिला कंटेनर लंडनला रवाना झाला आहे. आगामी ऑर्डर्सनुसार विविध देशांत निर्यातीचा विस्तार केला जाणार आहे.”
सभापती विश्वासराव आटोळे आणि सचिव अरविंद जगताप यांनी या यशस्वी सुरुवातीबद्दल निर्यातदारांचे अभिनंदन करत शेतकऱ्यांना अधिकाधिक प्रमाणात निर्यातक्षम उत्पादन घेण्याचे आवाहन केले.
भारतीय आंब्याचा सुवास आता जगभर दरवळणार!


