Homeलेखबारामतीचे कपिल माने यांनी सायकल वरून घेतले ,श्री समर्थ रामदास प्रस्थापित अकरा...

बारामतीचे कपिल माने यांनी सायकल वरून घेतले ,श्री समर्थ रामदास प्रस्थापित अकरा मारुती दर्शन….

श्री समर्थ रामदास प्रस्थापित अकरा मारुती दर्शन

                  चाफळमाजी दोन, उंब्रजेशी एक।
                      पारगावी देख चौथा तो हा॥
                  पाचवा मसुरी, शहापुरी सहावा।
                    जाण तो सातवा शिराळ्यातं॥
              शिंगणवाडी आठवा, मनपाडळी नववा।
                      दहावा जाणावा माजगावी॥
                 बह्यात आकरावा येणे रिती गावा।
                          सर्व मनोरथ पुरवील॥
                      वेणी म्हणे समर्थ रामदास।
                         किर्ती गगनात समाये॥

               अंजनीच्या सुता तुला रामाच वरदान 
            एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान 

विशेष आभार : श्रीनिवास वायकर.

आयोजक : बारामती सायकल क्लब

संकल्पना : श्री कपिल माने

              तसं पहायला गेलं तर श्री शिव‌छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक अखंड महाराष्ट्रात असंख्य फिरण्यासाठी ठिकाणे आहेत मग ते अष्टविनायक दर्शन, साडेतीन शक्तिपीठे, धार्मिक स्थळे, किल्ले त्याप्रमाणे श्री समर्थ रामदास प्रस्थापित अकरा मारुती दर्शन.

पहिला दिवस : बारामती शहर- फलटण- पुसेगाव- चौकीचा आंबा- औंध- गणेश वाडी- राजाच कुर्ले- ऐतिहासिक शामगांव घाट- शहापुर- मसुर- उंब्रज १४० कि.मी

                बारामती शहर कसबा येथुन गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन पहाटे ५.४५ वा सांगवी मार्गे निरा नदीच्या पुलावरुन फलटण च्या दिशेने सायकल प्रवास सुरु केला  सकाळी ठिक ७.३० वा फलटण मध्ये पोहचलो व पहिला चहाचा घोट घेतला थोडा वेळ थांबुन पुन्हा सायकल प्रवास पुसेगाव च्या  दिशेने सुरु केला फलटण सोडल्यानंतर समोरच एक उंच दुर्ग नजरेस पडला तो म्हणजे थाटात उभा असलेला 'वारुगड' चे लांबुनच नमस्कार करुन गडाचे फोटो काढले पुढे जात असताना सायकल प्रवास करत असताना व चढायला नकोसा असणारा घाट म्हणजे ताथवडे घाट सहा किलोमीटरचा खडा घाट थोडाच चढला पुढं बरेच अंतर कापायचे असल्याने उर्वरित घाट चालुन पुर्ण केला घाट उंच असल्यामुळे दीड तास लागले व घाट चढुन वर आल्यावर अर्धा तास आराम करत सरबत पिला व फ्रेश होऊन पुन्हा डिस्कळ,बुध असा प्रवास करत पुसेगाव च्या दिशेने सायकल प्रवास चालु केला ब-याच दिवसांपासुन सेवा‌गिरी महाराजांचे दर्शन घ्यायची इच्छा पुर्ण होणार होती बरोबर बारा च्या सुमारास पुसेगाव येथे सेवागिरी महाराज यांच्या मंदिरात पोहोचलो व दर्शन घेतलं सायकल प्रवास करुन आल्यामुळे भुक खुप लागली होती संस्थानचा प्रसाद चालु होता रांगेत उभे राहुन प्रसाद घेऊन स्वादिष्ट भात,आमटी व शि-यावर मनसोक्त ताव मारला व थोडा आराम केला. पुन्हा एकदा सायकल प्रवास चालु करत चौकीचा आंबा मार्गे औंध गाठले औंध मध्ये पोहचताच समोर औंधच्या यमाई देवीचे दर्शन घेतले पुढे गणेशवाडी मार्गे राजाचं कुर्ले येथे पोहोचेलो पुणे (देहु) येथील सहकारी मित्र रमेश माने यांचं गाव येथे आल्यावर त्यांच्या बंधुंनी दिमाखदार स्वागत केले व वडापाव व लस्सी ची व्यवस्था करत पाहुणचार करत फोटो काढले व त्यांचा निरोप घेऊन ऐतिहासिक शामगांव घाट उतरायचा असल्याने आनंद तर होताच घाट उतरुन आल्यावर सायकल प्रवासातील पहिला (शहापुर) च्या मारुतीच दर्शन घेऊन त्याच रस्त्याने पुढे जात दुसरा (मसुर) च्या मारुती चे दर्शन घेऊन मसुर येथे नाष्टा करत चहा पिला व सायंकाळ झाल्यानं पुन्हा एकदा सायकल प्रवास चालु करत उंब्रज येथे सायंकाळी सात वाजता पोहोचलो व उंब्रज येथे सायकलपट्टुंचे हक्काचे ठिकाण वरदान स्वीट होम म्हणजे आमचे सहकारी मित्र श्री सचिन निकम यांनी स्वागत केलं पाहुणचार करत मुक्कामाची व्यवस्था केली अशा प्रकारे प्रकारे पहिल्या दिवशी १४० कि.मी टप्पा पार करत उंब्रज येथे मुक्काम केला.

दुसरा दिवस : उंब्रज- माजगाव- चाफळ – शिंगणवाडी- उंब्रज- कराड- कासेगाव- तांबवे – बहे- कासेगाव- पेठ वडगांव-कोल्हापुर १४० कि.मी
दुसऱ्या दिवशी लवकर उठुन पुन्हा एकदा सायकल प्रवास चालु केला माझ्या बरोबर सहकारी मित्र श्री सचिन निकम सर सायकल प्रवास करण्यास सहभागी होणार आहेत याचाच आनंद जास्त होता त्यांनी व मी सायकल प्रवास चालु करत तिसरा (उंब्रज) च्या मारुती चे दर्शन घेऊन पाटण रस्त्याने माजगाव च्या दिशेने मार्गस्थ झालो व चौथा (माजगाव) येथील मारुती चे दर्शन घेतले आणि चाफळ कडे मार्गस्थ झालो (पाचवा) दास मारुती, (सहावा) वीर मारुती असे दोन मारुतींचे चाफळ येथे दर्शन घेतले व तेथील असलेल्या निसर्गरम्य व स्वच्छ परिसराचे फोटो काढले आणि चहा व नाष्टा केला आणि (सातवा) शिंगणवाडी येथील खडीचा मारुती च दर्शन घेतले व पुन्हा उंब्रज च्या दिशेने सायकल प्रवास चालु करत मार्गस्थ झालो व उंब्रज येथे पोहचत सचिन निकम सर यांनी निरोप घेतला आणि मी पुन्हा एकदा सायकल प्रवास चालु करत कराड च्या दिशेने निघालो १० वाजता कराड येथे आल्यावर नाष्टा केला आणि कासेगाव, तांबवे येथे आल्यावर गगनगिरी महाराज मठातील‌ व्यक्तीन बोलवुन विचारपुस केली व दोन कलिंगड कापुन खाऊ घातलं व जाताना सोबत डझनभर आंबे दिले त्यांचे आशिर्वाद घेऊन आभार मानले व त्यांचा निरोप घेऊन बहे च्या दिशेने मार्गस्थ झालो व दुपारी २.३० वाजता (आठवा) बहे रामलिंग बेट चा मारुती या प्रवासातील सर्वात निसर्गरम्य व पर्यटनस्थळ, बोटिंग, नदीचा नेत्रदीपक परिसर , खडकांवरुन वाहणार पाणी, नदीपात्रातुन लहान पुलावरुन जाणा-या वाटेने सायकल घेऊन मारुतीच्या मंदिराकडे जाऊन बहे रामलिंग बेट च्या‌ मारुतीचे‌ दर्शन घेतले व‌ आराम केला व‌ तेथील निसर्गरम्य परिसर मोबाईलमध्ये कैद केला‌ व पुन्हा ब्रिटिशकालीन पुलावरुन माघारी फिरत पुन्हा कासेगाव, पेठ वडगांव, शिये फाटा असा प्रवास करत करत सायंकाळी ७.३० वाजता करवीर नगरी कोल्हापुरला पोहोचलो व येथे मुक्काम केला.

दिवस तिसरा : कोल्हापुर शहर- राजारामपुरी – कळंबा जेल रोड – इस्पुर्ली – अर्जुनवाडा – बिद्री – मुधाळतिट्टा- आद्मापुर बाळुमामा ते पुन्हा कोल्हापुर ८८ कि.मी
भरपुर सायकल प्रवास करुन झाल्यानंतर तिसऱ्या जास्त प्रवास करायचा नव्हता आद्मापुरला जाऊ कि नको या संभ्रमात होतो विचार केला जाऊ दे एवढ्या लांब आलोय मग हे तरी का सोडायचे मग काय काढली सायकल,तिसऱ्या दिवशी दुपारी २.३० वाजता सायकल प्रवास चालु करत राजारामपुरीत गर्दीतुन वाट काढत कळंबा जेल रोड, इस्पुर्ली घाट चढुन, बिद्री असा प्रवास करत संत सद्गुरु श्री बाळुमामा यांच्या मंदिरात ५ वाजता पोहोचलो आणि बाळुमामांचे दर्शन घेऊन पुन्हा एकदा त्या रोडने प्रवास करत कोल्हापुर येथे ७.४५ ला पोहोचत करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरात पोहोचलो आणि महालक्ष्मीच दर्शन घेऊन नतमस्तक झालो अशा प्रकारे सायकल प्रवास करुन पुन्हा कोल्हापुरात मुक्काम केला

दिवस चौथा : कोल्हापुर – मनपाडळे- जुन नवं पारगाव- लाडेगाव- बत्तीस शिराळा- पेठ वडगांव- उंब्रज- रहिमतपुर १४० कि.मी
पुन्हा एकदा सकाळी लवकर उठुन ७. वा सायकल प्रवास चालु करत कोल्हापुरहुन प्रवासातील (नववा) मारुती मनपाडळे येथे पोहोचलो व मारुतीचे दर्शन घेतले पुन्हा एकदा सायकल प्रवास चालु करत शहरातील प्रवास झाल्यावर खेड्यातील ग्रामीण भागातील संस्कृतीचे दर्शन डोळ्यात साठवुन वन पट्ट्यात कधी कधी पिसारा फुलवून नाचणारा मोर नजरेस पडत होते सायकल प्रवास चालु करत जुन पारगाव दिशेने मार्गस्थ झालो व पारगाव‌ येथील (दहावा) मारुती चे दर्शन घेतले व पुन्हा एकदा सायकल प्रवास चालु करत नव पारगाव – लाडेगाव असा प्रवास करत नागपंचमीचे गाव म्हणुन प्रसिद्ध असणाऱ्या बत्तीस शिराळ्यात पोहोचलो व प्रवासातील शेवटचा (अकरावा) मारुती शिराळ्याचा मारुती चे दर्शन घेऊन मारुती समोर नतमस्तक झालो आणि अकरा मारुती दर्शन पुर्ण केल्याबद्दल आनंद गगनात मावेनासा झाला प्रवास इथंच थांबला नाही तर पुढे शिराळ्यात जिथं नागपंचमीच्या निमित्ताने मोठी यात्रा भरते त्या शिराळ्याची ग्रामदेवता अंबामाता देवीचे दर्शन घेऊन पुन्हा एकदा नतमस्तक झालो आणि मंदिरात आराम केला चहा व नाष्टा केला आणि परत सायकल प्रवास चालु करत पेठ वडगांव, कासेगाव, कराड असा सायकल प्रवास करत उंब्रज येथे आलो व जेवण केले जेवल्यानंतर थोडा आराम केल्यावर पुन्हा एकदा सायकल प्रवास चालु करत उंब्रज चा निरोप घेऊन मसुर,तारगांव असा सायकल प्रवास करत रहिमतपुर येथे ७.४५ वाजता पोहोचलो आणि या ठिकाणी मुक्काम केला अशा प्रकारे पुन्हा एकदा १४२ कि.मी प्रवास पुर्ण केला

दिवस पाचवा : रहिमतपुर- औंध- चौकीचा आंबा- पुसेगाव- फलटण- बारामती (१२० कि.मी )
अकरा मारुती दर्शन पुर्ण केल्यानंतर घराकडे निघायची ओढ लागली होती प्रवासातील अंतिम टप्पा असल्याने आनंद तर होताच त्यादिवशी उन जरा‌ कमीच होते ढगाळ वातावरण होते त्यामुळे मी जरा रहिमतपुर येथुन जरा उशीराच म्हणजे २ वाजता सायकल प्रवास चालु करत औंधच्या च्या दिशेने मार्गस्थ झालो पवारवाडीचा घाट वर चढुन आल्यावर समोरच औंधच्या यमाई देवीचे मंदिर नजरेस पडताच दर्शन घेतले आणि चौकीचा आंबा, विसापुर असा सायकल प्रवास करत ४.३० वाजता पुसेगाव येथे पोहोचलो व पुन्हा एकदा सेवागिरी महाराजांचे दर्शन घेतले आणि बुध,डिस्कळ असा प्रवास करत प्रवासाच्या पहिल्या दिवशी ज्या घाटाने अक्षरशः घाम काढला त्या ताथवडे घाटमाथा उतरण्यासाठी सज्ज झालो आणि पायथ्याशी पोहोचलो आणि फलटण च्या दिशेने मार्गस्थ झालो सायकल प्रवास करत फलटण येथे ७.३० वाजता पोहोचलो आणि चहा व सायंकाळची न्याहारी केली फलटणचा निरोप घेतला फलटण व बारामती रस्त्याचे काम चालु असल्याने सायकल हळुवार व येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेत बारामतीच्या दिशेने वाट काढत सांगवी मार्गे बारामती येथे रात्री ९.३० वाजता बारामती शहरात कसबा येथे सुखरुप पोहोचलो.

                    अशा प्रकारे कित्येक दिवसांपासुन अकरा मारुती दर्शन पुर्ण करायची इच्छा होती परंतु काहीना काही अडचण येत होती व हा प्रवास रद्द व्हायचा पण यावेळी मिळालेली संधी आणि सुट्टी यांचा दुहेरी संगम साधत आपणा सर्वांच्या आशिर्वादाने पुर्ण केला आणि सायकल चालवा, निरोगी रहा, व्यसनांपासुन दुर रहा असा संदेश सायकल प्रवास करत दिला. असेच प्रेम राहु द्या मी माझं एवढं लिखाण करुन थांबतो 

                  चला पुन्हा भेटु असाच एक ऐतिहासिक.      सायकल प्रवास घेऊन.............

लेखन : श्री कपिल माने

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on