गटारछाप वाचाळवीर राजकारण्यांनी महाराष्ट्राची वाट लावली!
महाराष्ट्राच्या राजकारणाला कधी काळी विचारधारांचे, तत्वांचे अधिष्ठान होते. मात्र, गेल्या काही वर्षांत गटारछाप भाषा, बिनबुडाचे आरोप, आणि फुकटचे सल्ले देणाऱ्या वाचाळवीरांची भर पडली आहे. विकास, उद्योग, शेतकरी, युवक यांच्या समस्या सोडवण्याऐवजी हे तथाकथित नेते सतत बेताल वक्तव्ये करून महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेला तडा देत आहेत.
सभागृह असो वा सोशल मीडिया, काही नेत्यांचे बोलणे इतके खालच्या पातळीवर गेले आहे की, त्यावर चर्चा करणेही लाजिरवाणे वाटते. टीका आणि विरोध हा लोकशाहीचा भाग असला तरी, त्याला सुसंस्कृत मर्यादा हव्यात. मात्र, आजच्या काही नेत्यांना स्वतःची मर्यादा राहिली नाही. व्यक्तिगत आरोप, शिवीगाळ, विनाकारण भांडण उकरून काढणे हेच त्यांचे राजकारण राहिले आहे. महाराष्ट्राची ओळख विचारवंत, समाजसुधारक, आणि नेतृत्वक्षम नेत्यांची आहे. मात्र, सध्याचे काही राजकारणी राज्याचे चारित्र्य कलंकित करत आहेत.
या वाचाळवीरांनी राज्याच्या विकासाऐवजी व्यक्तिगत प्रसिद्धीच्या मागे लागून सामाजिक विष पसरवले आहे. उद्योग राज्याबाहेर जात आहेत, बेरोजगारी वाढत आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न चिघळत आहेत, आणि युवा पिढी संभ्रमात आहे. याला जबाबदार कोण? अशा बेजबाबदार राजकारण्यांना धडा शिकवायचा असेल, तर जनतेनेच सुजाणपणा दाखवावा लागेल. अन्यथा, हे वाचाळवीर महाराष्ट्राचे भवितव्य अधिक अंधारमय करतील!
