अज्ञानात सुख असते…
न सोचें जो कल क्या लाएगा,
हर लम्हा बस मुस्काएगा।
हकीकत की दुनिया मे गम बहुत,
अज्ञान ही सुकून दिलायेगा।
महाराष्ट्र राज्यात सद्यस्थितीत खूप मुद्द्यांची चर्चा होत आहे. हे सर्व मुद्दे खूप गरजेचे आहेत का? असाही प्रश्न ज्या ठिकाणी निर्माण होतो त्या ठिकाणी या वादग्रस्त मुद्द्यांमध्ये आपण अज्ञानी असल्याचे दाखविणे, हेच सुखकारक ठरते. सध्याच्या वादग्रस्त मुद्द्यांमध्ये मुघल सम्राट औरंगजेबची खुलताबाद येथील कबर काढून टाकणे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर वाघ्या कुत्र्याची समाधी हटविणे, अशा काही ज्वलंत मुद्द्यांचा समावेश आहे. हे राज्य पातळीचे मुद्दे असले तरी गाव, कुटुंब, घर पातळीवरचे असे अनेक मुद्दे व अनेक विषय असतात, त्यामध्ये आपण अज्ञानी आहोत अर्थात ‘कानावर हात ठेवले’, की सुख प्राप्त होते, असे अनुभवांती लक्षात येते.
कोणत्याही वादग्रस्त प्रकरणात अज्ञान दाखविणे हे खरे तर मनःशांतीसाठी फायदेशीर ठरते. वास्तविक अज्ञान असणे व अज्ञान दाखविणे यात मोठा फरक आहे. तेव्हा आवश्यक त्या ठिकाणी ज्ञान व आवश्यक त्या ठिकाणी अज्ञान दाखविणे हिताचे ठरते. यातूनच ‘मौनं सर्वार्थ साधनम्’ असेही सुभाषित आले असावे. प्रत्येक व्यक्ती ज्ञानी असू शकते, मात्र कुठे ज्ञानी व कुठे अज्ञानी रहावे, हे त्या व्यक्तीला समजले तर त्या व्यक्तीवरील संकटे, वादविवाद व इतरही अनेक अप्रिय गोष्टी टाळता येतात. याची जाणीव खर्या अर्थाने आजच्या राजकारण्यांनी ठेवणे खूप गरजेचे वाटते.
प्रत्यक्षात समाजात घडणार्या अनेक घटनांचा आणि अनेक विषयांचा दैनंदिन जीवनात फरक पडत नसतो. तेव्हा त्याबाबतीत सहभाग कशाला असावा? असे वाटते. औरंगजेबची कबर ३१८ वर्षापासून आहे. तरीही काहीच फरक पडला नाही व यापुढेही ती कबर राहिली तरीही काही फरक पडणार नाही. त्याचप्रमाणे वाघ्या कुत्र्याची समाधी आहे. त्यानेही काहीच फरक पडत नाही, असे मानणारा एक मोठा वर्ग आहे. मात्र जनतेला भावनिकरित्या कशाततरी अडकून ठेवणे आवश्यक असते, असा समज असलेल्यांना असे मुद्दे लागत असतात. वास्तविक कोणत्याही मुद्द्याचे समर्थन व विरोध करता येतो. मात्र ज्या मुद्द्याचा उपयोग सकारात्मकरित्या होतो, तोच मुद्दा पुढे रेटला पाहिजे तसेच ज्या गोष्टीचे ज्ञान आपल्याला चिंता, दुःख किंवा अस्वस्थता निर्माण करू शकते त्याबाबत अज्ञानी असणे फायदेशीर ठरते.
लहान मुलांना या जगातील संकटे, आर्थिक समस्या, राजकीय उलथापालथ यांची जाणीव नसते, त्यामुळे त्यांचे हे अज्ञान त्यांना आनंदी व सुखी ठेवते. एखाद्या गंभीर आजाराची माहिती नसेल तर तणाव कमी राहतो, भीती कमी राहते, कोण आपल्या विरुद्ध काय बोलतो आहे, याची माहिती नसेल तर संबंध चांगले राहतात. परीक्षेचा निकाल आणि येणारी संकटे यांची माहिती नसेल तर मनुष्य चिंतामुक्त राहतो, असे अनेक फायदे अज्ञानी राहण्याचे आहेत. अनेक वेळा सरकारी कर्मचारी अज्ञानता दाखवून ‘बने रहो पगले काम करेंगे अगले’, अशी भूमिका घेतात. प्रत्यक्षात प्रत्येक वेळी अज्ञान चांगले नसते. हे पण तेवढेच खरे. तसेही ज्यांना ज्ञान प्राप्ती होते, ते शांत होतात व कमी व्यक्त होतात, असा आध्यात्मिक संदेश आहे. तेव्हा आपण ज्ञानी असलो तरी शांत राहणे हेच सुखकारक ठरते.
वादग्रस्त मुद्दे वेळोवेळी उकरून काढणे व त्यावर सामाजिक वातावरण बिघडविणे किंवा दंगली घडवून आणणे, हे काही लोकांसाठी आवश्यक असते किंबहुना त्यांचे ते कामच असते. मात्र जनता ही दूधखुळी नसते. तिला सर्व गोष्टी समजतात. परंतु काही लोक अपरिहार्यता म्हणून या सर्व प्रकारात सहभागी होतात. त्यामुळे तेवढ्या काळापुरते ते प्रकरण गाजविल्या जाते. यामुळे नुकसान होते ते सर्वसामान्यांचे. कोणाचा जीव जातो तर कोणाच्या संपत्तीचे नुकसान होते. मात्र राजकीय पोळी यावर शेकल्या जाते, असे म्हणता येईल. तेव्हा तरुणांनी कोणत्या मुद्द्यावर केव्हा पेटून उठायचे आणि केव्हा न पेटता शांत राहायचे, याचा गांभीर्याने चर्चा करुन निर्णय करायला हवा.
शेवटी हेतूपूर्वक काही बाबींबाबत अज्ञानी रहावे, असा विचार करताना या आशयाचा एक शेर आठवतो…..
जो अनजान है वो बेफिक्र हैं,
हर गम से जैसे बेअसर हैं।
सच की आग मे जो जलते हैं,
अक्सर तन्हा रहते हैं।
– – राजेश राजोरे
मो.नं. : ९८२२५९३९०३
rajeshrajore@gmail.com
खामगाव, जि. बुलडाणा.
(लेखक हे दैनिक देशोन्नतीच्या बुलडाणा आवृत्तीचे संपादक आहेत.)
